Sunday, 25 December 2016

बंगालमधील दंगल

दि. २६ डिसेंबरच्या दै. 'मुंबई तरुण भारत'मधील माझा वेध...!
***
बंगालमधील दंगल


पश्चिम बंगालमध्ये दंगल भडकल्याची, कट्टर धर्मांधतेची बातमी तर नेहमीच येत असते. त्यातून तेथील भयानक परिस्थितीचा भीतीदायक अंदाजही लावता येतो. आताची घटना ही बंगालची राजधानी कोलकातापासून केवळ २८ किमी दूर असलेल्या धुलागड येथील बालीजीपोर गावातील आहे. या गावात ईद--मिलादच्या दिवशी धर्मांधांनी आपल्या माजोर्या वृत्तीचे दर्शन घडवत शिवमंदिर उद्ध्वस्त केले. त्यानंतर गावात दंगल भडकली, ज्यात हिंदूंच्या घरांना आगी लावल्या गेल्या, दगडविटांचा मारा करण्यात आला, घरात घुसून लुटालूट-तोडफोड केली. एवढेच नव्हे तर हिंदूंच्या घरांवर देशी बॉम्ब फेकण्यापर्यंत या धर्मपिसाटांची मजल गेली. मात्र एवढे होऊनही नोटाबंदीवर गल्ली ते दिल्ली कल्ला करणार्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तोंडातून याविषयी चकार शब्दही निघाला नाही किंवा सरकारमधील कोणा मंत्र्यानेही याप्रकरणी तोंड उघडले नाही. उलट मतांच्या आणि तुष्टीकरणाच्या लाळघोट्या राजकारणाची सवय लागलेल्या ममता बॅनर्जी आणि तृणमूल कॉंग्रेसचा गुलशन मलिक नामक स्थानिक नेताच यामागे असल्याचे चव्हाट्यावर आले. दंगलीमुळे असुरक्षित झालेल्या हिंदूंनी जेथे आश्रय घेतला ती मंदिरे आणि हिंदू समहटी संस्था नष्ट करण्याची धमकीही त्याने दिली. देशभरातील गळाकाढू पुरोगामी आणि अहिंदूंवर अन्याय झाल्याच्या कंड्या पिकवून फक्त तेव्हाच बाहेर पडणारी सेक्युलर वटवाघुळेही या घटनेनंतर चिडीचूप झाली. नोटाबंदीमुळे हिंदूंना त्रास झाल्याची भंपकबाजी करणारे केजरीवाल, जेएनयु-हैदराबादमध्ये पर्यटन करणारे राहुल, जातीय राजकारणावर आपल्या स्वार्थाची पोळी भाजणारे माया-मुलायम, ओवेसी आणि पुरस्कारवापसी करणारा कथित बुद्धिवाद्यांचा चमको कंपूही या घटनेनंतर चिडीचूप बसला. बालीजीपोर घटनेत तब्बल ६० पेक्षा अधिक परिवारांनी आपल्या गावातून पलायन केले. तरी देशात असहिष्णुता वाढल्याची बतावणी करणारे चंदेरी दुनियेतील कचकडे आणि राईचा पर्वत करणारे बोलघेवडे यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला राजी नाहीत. एरवी अहिंदूंना खरचटले तरी ऊर बडवून घेणारे पोपट आता साधी टिवटिव करतानाही दिसले नाहीत. त्यामुळे आता तरी या सर्व हिंदूविरोधकांचा खरा चेहरा सर्वांनीच ओळखणे आवश्यक आहे. तसेच ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, त्या पोलिसांनीही दंगलखोरांवर ताबडतोब कारवाई न केल्याने धर्मांधांचे मनोबल वाढले, अशा अधिकार्यांवरही आता कारवाई व्हायला हवी, हीच सामान्य हिंदूंची अपेक्षा आहे.


वाली कोण?

बालीजीपोर येथील घटनेनंतर दंगलीचे लोण इतरत्रही पसरले पण याची कोणाला खबरही नाही. गुजरात, मुझफ्फरनगर आणि दादरीतील दंगल आणि हिंदूंविरोधात आघाडी उघडणारे बोलभांड बंगालमधील दंगलीनंतर कुठल्या मातीत चोच खुपसून बसले आहेत? हेही जनतेसमोर आले पाहिजे. बिहारमधील लालूप्रसादांच्या राजवटीला जंगलराज म्हटले जायचे, तसेच ममता सरकारचेही दंगलराज नामकरण व्हायला हवे, पण दंगल करणारे धर्मांध मुस्लीमआणि दंगलग्रस्त हिंदू असल्याने तमामपुरोगामी मुखंडांना सगळे काही मंगलच मंगल भासत असावे, त्यामुळेच ही जमातअगा काही घडलेचि नाहीच्या आविर्भावात मूग गिळून बसली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने तर याआधीच ममता सरकारच्या दाढी कुरवाळू राजकारणाला फटकारले होते, मात्र तरीही त्यातून धडा न घेणार्या हेकेखोर ममता नोटाबंदीवर मात्र हाहाकार करतात. हे कुठले लक्षण मानायचे? यातून केवळ पश्चिमबंगालच नव्हे तर देशभरात चुकीचा संदेश जात असून हिंदूंना हा देश सुरक्षित नसल्याची भावना निर्माण होण्याचा धोका आहे. ज्याला तृणमूल कॉंग्रेससारख्या पक्षांच्या वर्तणुकीने खतपाणीच मिळत आहे.
तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या अनेक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटना आणि बांगलादेशी घुसखोरांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे आरोप याआधी झाले, आता तर अशा घटनांतून हे आरोप सिद्धच होतात. बांगलादेशींची मतपेटी सुरक्षित करण्याची तर ममता बॅनर्जी आणि तृणमूलची ही चाल नाही ना याचीही आता चौकशी व्हायला हवी. याच घटनेचा तपास करण्यासाठी भाजप खासदारांचे प्रतिनिधी मंडळ बालीजीपोर गावी गेले, मात्र त्यांना तेथे जाण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला. देशातील खासदारांना पीडितांना भेटू दिले जात नसेल आणि राज्य सरकारही हिंदूंना लाथाडत असेल तर त्यांनी कोणाकडे पाहावे? पश्चिमबंगाल सरकार यालाच लोकशाही म्हणते का?
हिंदूंवर आणि त्यांच्या नेत्यांवर हल्ल्याच्या घटना केवळ बंगालमध्येच नव्हे तर केरळ आणि उत्तर प्रदेशातही घडल्या. केरळात तर कित्येकांची हत्या करण्यात आली. येथील कम्युनिस्ट सरकारही हिंदूविरोधाची भूमिका कायम ठेवते. मात्र धर्मनिरपेक्षतेची जपमाळ ओढणारे मानवाधिकाराचे म्होरके याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. या सर्व गोष्टींमुळे हिंदूंनी एकाच छत्राखाली एक होण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते.

- महेश पुराणिक

Sunday, 4 December 2016

ममतांचा थयथयाट

दि. ५ डिसेंबर २०१६च्या दै. 'मुंबई तरुण भारत'मधील माझा वेध...!
***
ममतांचा थयथयाट

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला आणि सुरुवातीला पाठिंब्याची की समर्थनाची भूमिका घ्यावी, या गोंधळात हरवलेल्या विरोधकांत मात्र नंतर याविरोधात जणू काही आरोप करण्याची स्पर्धाच लागली. संपूर्ण दिल्लीत चिकनगुनिया, डेंग्यूच्या साथीने आणि नंतर वायुप्रदूषणाने धुमाकूळ घातलेला असताना दिल्लीबाहेर भटकणारे आणि न्यायालयाने खडसावल्यानंतर जागे झालेले केजरीवाल मग या राष्ट्रीय प्रश्नावर भलतेसलते बरळले तर केजरीवालांची दुसरी आवृत्ती म्हणाव्या अशा ममता बॅनर्जीही मोदींविरोधातल्या स्वार्थी मैदानात उतरल्या. नोटाबंदीनंतर या निर्णयाला पहिला विरोधही ममतांनीच केला होता. शारदा चिट फंड घोटाळ्याच्या चिखलात ज्यांचे हात बरबटल्याचा आरोप आहे, त्या गरीबांच्या नावाने थयथयाट करू लागल्या. प. बंगालमध्ये महामार्गावर, टोलनाक्यांवर चाललेल्या लष्कराच्या नैमित्तिक कार्यावर त्यांनी आक्षेप घेतला, यात त्या एवढ्या पुढे गेल्या की, त्यांनी थेट लष्करावर राज्य सरकार उलथवून टाकण्याचा अश्लाघ्य आरोप केला. जे लष्कर आपल्या स्थापनेपासून सीमेवरच नव्हे तर कोणत्याही आपत्तीत देशातील नागरिक आणि लोकशाहीच्या रक्षणाची भूमिका आपल्या प्राणांचे बलिदान देऊनही पार पाडत आले त्यावर असला बिनबुडाचा आणि घाणेरडा आरोप करून ममतांनी लष्कर आणि लोकशाही व्यवस्थेत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत देशात मोहोळ उठवून दिले. याप्रकरणी लष्करानेच स्पष्टीकरण दिल्यानंतर मात्र ममता चांगल्याच तोंडावर आपटल्या. नोटाबंदीच्या विरोधात ममता बॅनर्जींचा प्रत्येक आरोप त्यांच्याविषयी लोकांच्या मनात संशय निर्माण करणारा ठरला. नोटाबंदीमुळे खरे तर पाकिस्तान, बांग्लादेश येथून येणारा बनावट नोटांचा खजिना मातीमोल झाला. यामुळे दहशतवाद्यांची आणि नक्षलवाद्यांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली. परंतु, या चांगल्या आणि देशहितकारक परिणामांकडे न पाहता ममता अधिकच आक्रमक होत गेल्या, त्यातूनच त्यांनी राष्ट्रपतींचीही भेट घेतली, ज्याला शिवसेनेनेही अविचारी साथ दिली. ममतांच्या या रोषामागे मात्र दुसरेच एखादे कारण असण्याचीही दाट शक्यता आहे. बंगालमध्ये बेकायदेशीरपणे राहणार्‍या आणि ममतांची व्होटबँक असणार्‍या हजारो बांगलादेशींच्या मुळावर तर हा निर्णय आला नसेल ना? बांगलादेशातून येणार्‍या बनावट नोटा केवळ कागदाचा तुकडा झाल्याने तर हा तडफडाट होत नसेल ना? याआधी बंगाल राज्य सरकारच्या आणि तृणमूल कॉंग्रेसच्या काही नेते आणि आमदार-खासदारांवर बनावट नोटांच्या व्यापारात हात असल्याचे आरोप झालेले आहेत, त्यामुळे गरीबांच्या नावाखाली या बनावट पैशाने आपल्या ज्या सहकार्‍यांचे हात माखले होते, त्यांच्यासाठी तर ममतांचा हा आक्रोश नसेल ना? साधी राहणी अशी ओळख असलेल्या ममतांच्या राज्यात जिहादी विचारसरणीच्या घुसखोरांकडील पैशाचा ओघ आटल्याने तर ही आगपाखड नसेल ना? असे अनेक प्रश्न त्यांच्या आरोपांमुळे निर्माण होतात. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांनी ममतांचे खरे रूप कळल्याने त्यांच्या आरोपांना काडीचीही किंमत दिली नाही.

एकीकडे मोदीद्वेषाने फणफणलेल्या ममता बॅनर्जी तर दुसरीकडे कॉंग्रेससह अन्य लोक नोटाबंदीच्या विरोधात ’कार्यकर्ता आक्रोश’ करत रस्त्यावर उतरले, मात्र त्यांना जनपाठिंबा काही मिळाला नाही, उलट त्यांचे चांगलेच हसेही झाले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींचे सर्वच विरोधक इमानेइतबारे आपली राजकीय मक्तेदारी बचावण्यासाठी विचार वगैरे खुंटीवर टांगून एकत्र आले आणि आरोपांचे सत्र सुरू झाले. मात्र या निर्णयाने भविष्यात देशाला आणि पर्यायाने देशातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे ते सोयीस्कररित्या विसरले. मोदींच्या ध्येयातील कॅशलेस-डिजिटल अर्थव्यवस्था साकारल्यानंतर अनेक अवैध धंदे, भ्रष्टाचार, लाचखोरी थांबणार असल्याने देशातील नागरिक-मतदार पुन्हा पुन्हा मोदी आणि भाजपलाच मते देणार. त्यामुळे मग आपली पिढ्यान्‌पिढ्यांची राजकीय दुकानदारी मोडीत निघण्याचा धसका या लोकांनी घेतल्याचे त्यांच्या प्रत्येक कृत्यावरून स्पष्ट होत आहे. तसेच मोदींचा हा नोटाबंदीचा निर्णय यशस्वी झाल्यास आपल्याला कायमचेच विरोधात बसावे लागेल आणि मग आपल्या अनेक पिढ्यांचे भवितव्य अंधारात जाईल, यामुळेही हा गरीबांच्या नावाने मगरीचे अश्रू ढाळण्याचा प्रकार होत असेल. एवढेच नव्हे तर ३ वर्षांपूर्वी अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराविरुद्ध छेडलेल्या आंदोलनात भ्रष्टाचार्‍यांच्या विरोधात पोटतिडकीने बोलणारे आज या दांभिकांची तोंड फाटेस्तोवर वकिली करताना दिसले. अर्थात मोदीद्वेषाची लागण झाल्यानेच त्यांच्या मुखातून अशी मळमळ बाहेर पडली. या सर्वात बिहारचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदींचे राजकीय विरोधक असलेल्या नितीशकुमार यांनी मात्र नोटाबंदीच्या निर्णयाचे जाहीर समर्थन करत सर्वांनाच धक्का दिला आणि ज्यांना याचा त्रास झाला त्यांनी फुकाचा कल्लोळ केला. नोटाबंदीनंतर नागरिकांना नव्या नोटा मिळण्यात, व्यवहार करण्यात, खरेदीसाठी जरी अडचणी येत असल्या तरी त्यांचा मोदींना पूर्ण पाठिंबा असल्याचे आतापर्यंत दिसले आणि यापुढेही तो पाठिंबा तसाच राहिल हे नक्की. देशातील नागरिक सुज्ञ असल्याने आणि त्यांच्याकडे अजस्त्र असा काळा पैसा नसल्यानेच ते मोदींचे समर्थन करत आहेत आणि ज्यांच्याकडे काळ्या पैशाच्या राशीच्या राशी आहेत ते मात्र मोदींना शिव्याशाप देत आहेत.
 
- महेश पुराणिक