Saturday, 16 May 2015

त्यांना मुळापासून उखडून फेकायलाच हवे...!


इस्लामच्या नावाखाली जिहादची आरोळी देणाऱ्या जागतिक मुस्लिम संघटनांनी अमानुषतेचा कळस गाठला आहे. या तथाकथित शांतातावाद्यांनी रक्त मांसाचा सडा पाडला नाही असा एकही दिवस गेल्या काही वर्षात उजाडला नाही आणि उजाडतही नाही. निष्पाप, निरपराध, निरागस जीवांच्या रक्ताचा सडा पाडणे हा कसला धर्म, कसला जिहाद, कसली शांतता, हि कसली शिकवण.?

खरे म्हणजे हा तर अधर्मच म्हणायला हवा. पाकिस्तान, सिरीया, लिबिया, इराण, इराक आणि अजूनही कितीतरी देशात इस्लामी मुलतत्ववादी इतरांचे जीवन संपवण्याचा अमानुष, रानटी नंगानाच करत आहेत. हा संघर्ष मुस्लिम देशात मुस्लिम विरुद्ध मुस्लिम असाच मोठ्या प्रमाणत सुरु आहे, आणि जोडीला तेथील इतर धर्मियांना देखील निर्दयपणे ठार केले जात आहे. शिया आणि सुन्नी हा संघर्ष शेकडो वर्षापासून सुरु आहे. इस्लामी मुलतत्ववादी सुन्नी व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारच्या मुस्लिमाला मुस्लिम मानतच नाहीत. त्यांच्या दृष्टीने ते सर्व काफिरच समजले जातात. आणि त्यांच्या मतानुसार काफिरांना मूळ इस्लाम कबुल केल्याशिवाय जगण्याचा कोणताही अधिकार नाही. म्हणून त्यांची राजरोस कत्तल करण्याचे एकमेव उद्दिष्ट या संघटनांनी आपल्या समोर ठेवले आहे.

'इसीस',  ‘जुन्दुल्लाह’ सारख्या इस्लामी कट्टरता वादी संघटना धर्माच्या नावावर अधर्मच करत आहेत. अत्यंत निर्दयीपणे डोक्यात गोळ्या घालून , महिलांना निर्दयपणे हालहाल करून, लहान मुलांना कापून, तुकडे करून, या संघटना त्याचे व्हिडीओ इंटरनेटवरून प्रसारित करण्याचे अमानवी चाळे करत आहेत.
इस्लाम जातपात मानत नाही, जातीभेद मानत नाही. इस्लाम हाच जगातील एकमेव सर्वसमावेशक धर्म आहे, असे डांगोरे इस्लामी अभ्यासक, इस्लामचे तत्त्ववेत्ते आणि मुल्लामौलवी नेहमीच पिटत असतात. हिंदूंची धर्मांतरे घडवण्यासाठीही अशा थापा मारल्या जातात. या सर्व थापाड्यांचे इस्लामी देशातील सुन्नी मुस्लिमा व्यतिरिक्त इतरांचे हत्याकांड यावर काय म्हणणे आहे, हेदेखील आता जगासमोर यायला हवे.

हिंदू धर्म जातीपातींमध्ये विखुरला गेला आहे, वेगवेगळ्या पंथांमध्ये विभागला गेला आहे. त्यामुळे हिंदू धर्माचे नुकसान झाले हे खरेच, पण हिंदू धर्मातील जाती-पाती कधी अशा एकमेकांच्या रक्ताला चटावल्या नाहीत. एकमेकांच्या छाताडावर बसून आपल्याच धर्मबांधवांचे रक्त पिण्याचे क्रौर्य हिंदू धर्मात तरी कधी झालेले नाही. हिंदू धर्मातील जातीभेदावर बोट ठेवून धर्मांतरे घडवणार्‍या मुल्ला मौलवींनी आधी आपल्या बुडाखाली काय जळते आहे ते पाहावे.

मुळात शिया आणि सुन्नी हा संघर्षही काही नवीन नाही. (आता सुन्नी विरुद्ध इतर सर्व काफिर, त्यात हिंदू देखील आलेच) मोहंमद पैगंबरांच्या मृत्यूपासूनच हा रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष उद्या जगासाठी डोकेदुखी ठरू शकतो. भारतात देखील यांच्या पिलावळी आपले हातपाय पसरवण्यासाठी आतुर झालेल्या आहेत. भारतात देखील या धर्मांधांना असेच हत्याकांड करण्याची इच्छा आहे. अधून मधून त्यांचे हस्तक आपले विखारी दुर्विचार उधृत करून भारत अशांती माजवण्याचा प्रयत्न करतच असतात. या इस्लामी कट्टरता वाद्यांचा धोका वेळीच ओळखून दोन्ही पंथांतील धर्मांधांना नेस्तनाबूत करण्यासाठी जगभरातील देशांनी, भारतातील मुस्लिम संघटना तसेच राजकीय नेत्यांनी देखील पुढे येण्याची आवश्यकता आहे. वाढता इस्लामी दहशतवाद रोखण्यासाठी संयुक्त व्यूहरचना आखायला हवी. अन्यथा हा रक्तपात जगभर पसरेल.

केवळ मुस्लिम धर्मीय म्हणजे अल्पसंख्याक आणि त्यांच्या विरुद्ध बोलायचे नाही, अथवा शेपूट घालून बसायचे हे भारतीय राजकारण्यांनी टाळले पाहिजे. जे इस्लामी देशात सुरु आहे त्याचे लोण भारतातही पसरू शकते. हे संकट ओळखून कट्टरतावादी जे कोणी असतील त्यांच्या विरुद्ध आताच उपाय योजना करायला सुरुवात केली पाहिजे. या मानवी रूपातील अमानवांकडे मानवाधिकाराच्या  दृष्टीने पाहून देखील काही उपयोग नाहीच, कारण ते जर मानव असते तर त्यांनी इतर मानवांना संपवण्याचा प्रकार कधी केलाच नसत, ते अमानुष आहेत आणि त्यांच्याशी तसेच वागले तरच जगात मानवी समाजाचे अस्तित्व टिकेल, त्यांना (कट्टरता वादी) मुळापासून उखडून फेकायलाच हवे...!

<< संदर्भ -  सामना, अग्रलेख, १६/०५/२०१५ >>

Friday, 15 May 2015

मराठ्यांनो स्वतःच्या स्त्रियांचा अपमान करू घेऊ नका...!

" कुणबीण : मराठेशाहीतील स्त्री-गुलाम "

' कुणबी ' हा शब्द व्यवसायवाचक आहे . म्हणजे शेती करणारा तो कुणबी . पण हा शब्द जातीवाचकहि आहे . म्हणजे महाराष्ट्रात ' कुणबी ' नावाची जात आहे . उदा. मराठा कुणबी , कोकणी कुणबी , खानदेशी कुणबी , गुजराथी कुणबी वगैरे . या कुणब्याची बायको म्हणजे कुणबीण असा सरळ अर्थ होऊ शकतो . पण मराठेशाहीच्या कागदपत्रांत ' कुणबीण ' हा शब्द या अर्थाने येत नाही . तो ' स्त्री-गुलाम ' या अर्थाने येतो . या ' कुणबिणी ' चा कुणबी जातीच्या स्त्रियांशी काही संबंध नाही , हे ध्यानात घेतले पाहिजे .

जगाच्या पाठीवरील जवळजवळ सर्व प्राचीन संस्कृतीत ' गुलामगिरी अथवा दास्यत्व ' याची पद्धत आढळते . मध्ययुगातही ती मोठ्या प्रमाणावर चालू राहिली . आधुनिक काळखंडात स्वत:ला सुसंस्कृत समजणार्या युरोपियनांनी आफ्रिका खंडातील लाखो , करोडो , निग्रोंना श्वापदांप्रमाणे पकडून त्यांचा अमेरिकेत व्यापार केल्याचा इतिहास सर्वज्ञात आहे . हिंदुस्थानात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुलामांचा व्यापार होत नव्हता , हे खरे . पण गुलामगिरीची पद्धती राजरोसपणे ब्रिटीशांची सत्ता स्थिर होईपर्यंत चालू होती , हेही तितकेच खरे .
महाराष्ट्रापुरते सांगायचे झाल्यास पुरुष गुलामांपेक्षा स्त्री गुलामांची संख्या मोठी होती ; किबहुना स्त्री गुलामांची खरेदी-विक्री झाल्याच्या नोंदी जशा मराठी कागदपत्रांत अनेक मिळतात , तशा पुरुष गुलामांच्या मिळत नाहीत . पुरुष गुलामांना ' पोरगे ' असे म्हणत आणि त्यांचा जन्म स्त्रीगुलामांच्या म्हणजे कुणबिणींच्या पोटीच झालेला असे . अशा पोरग्यांच्या नोंदी मात्र मिळतात . असे पोरगे आपल्या आईबरोबर विकले जात आणि ते मात्र गुलाम समजले जात . पण त्यांची पुढची पिढी मात्र गुलाम समजली जात नसे . कुणबिणींचा व्यापार करणारे चारण , हेडे हे लोक असत . ते कुणबिणी जशा विकावयास आणत , तशा प्रकारे गुलाम विकावयास आणल्याच्या नोंदी मिळत नाहीत .

मराठी कागदपत्रांत कुणबीण , बटीक ह्या दोन्ही संज्ञा समान अर्थानेच वापरलेल्या दिसून येतात .
( मराठेशाहीचे अंतरंग - डॉ जयसिंगराव पवार )

कुटुंबातील दासी व्यभिचारिणी झाली की तीला बटिक अथवा कुणबीण म्हणत. पेशवाईच्या काळात राजे-रजवाडे, सरदार, श्रीमंत पुरुष आपल्या पदरी कुणबीणी अथवा बटकी बाळगत. पुर्वी दुष्काळ पडला म्हणजे माणसे हलाखीने आपली मुलेबाळे विकत. प्रत्येक सुखवस्तु माणसाकडे कुणबीण ही असायचीच, अशी प्रथा होती. परदेशी लोक भारतात आल्यावर त्यांनीही बटीक बाळगल्या आहेत. म्यलेटने ६५ रुपयांना एक कुणबीण खरेदी केली होती असा उल्लेख आहे. बटकी किंवा कुणबिणी राजेरजवाड्यांना व सरदारांना नजराना म्हणुनही दिल्या जात. हेडे-चारण ई. लोकांचा बटकी विकायचा व्यवसाय असे. (संदर्भ: भारतीय संस्कृती कोश, खंड दुसरा, पान ४५) येथेही कुणबिण कोणत्या एखाद्या विशिष्ट जातीची असे असा उल्लेख नाही.

"शेतकऱ्यांच्या बायका पुरूषांच्या बरोबरीने कामे करीत. मध्यम वर्गातील काही जातीच्या किंवा घराण्यातील स्त्रियांना अर्थार्जनासाठी बाहेर पडता येत नसे. देवांगना, गणिक  वगैरे वर्ग समाजात होते. तमाशातही भाग घेत. वाघ्या-मुरळी सर्व महाराष्ट्रात आढळत. कुणबिणी बाळगण्याची चाल महाराष्ट्रात होती."
संदर्भ : मराठी विश्वकोश, http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/23-2015-01-14-06-25-27/10393-2012-07-19-09-14-43?showall=1&limitstart=

"राज्यांतील अठरा मोठीं खातीं. यांच्या वर्गीकरणाचे तीन प्रकार आहेत, ते असे ( मोलस्वर्थ व  क्यांडी यांच्या कोशाप्रमाणें. ) : ( १ ) उष्टर; खबुतर; जनान; जवाहीर; जामदार; जिकीर; तालीम; तोफ; थट्टी; दप्तर; दारू; दिवान; नगार; पील; फरास; वंदी; मोदी; शिकार-असे अठरा खाने. ( २ ) तोप-पील; उष्टर; फरास; शिकार; रथ; जामदार; जवाहीर; जिराईत; नगार; दारू; वैद्य; लकड; इमारती; मुदबख; कुणबिणी; खाजगत; थट्टी येणेंप्रमाणे- ( ३ ) खजिना दफ्तर; जामदार; पील; जिराईत; अंबर; फरास; मुदबख; नगार; सरबत; आवदार; शिकार; तालीम; दारू, उष्टर; बकरे; तोप; तराफ.
(संदर्भ: केतकर ज्ञानकोश. http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-09-43-34/1520-2012-10-22-07-21-32

अदिकल – अंबलवासी जातिसमूहापैकीं एक वर्ग-हे मूळचे ब्राह्मण आहेत असें म्हणतात; परंतु भद्रकालीच्या देवळामध्यें उपाध्यायाचें काम केल्याकारणानें व मांस आणि दारू यांचे नैवेद्य दाखविले म्हणून ते भ्रष्ट झाले. ते यज्ञोपवीत धारण करितात, क्षुद्र देवतांच्या देवळांमध्ये उपाध्यायाचें काम करतात, व दुसरीं देवळांतलीं कामें करतात. लग्न आणि वारसा या बाबतींत ते मक्कत्तयम नियमांप्रमाणें वागतात. ते वृद्धि व सुतक दहा दिवस पाळतात. दहा गायत्रीमंत्र जपतात; त्यांच्याच जातीचे लोक त्यांची भिक्षुकी करितात. त्यांच्या बायकांस आदियम्मा असें म्हणतात. नम्बुद्रि बायकांसारिखे दागिने या वापरतात पण बाहेर जातांना त्यांच्यासारखी ताडाची छत्री घेत नाहींत व त्यांचेप्रमाणें नायर कुणबीण बरोबर नेत नाहींत. [ Castes and Tribes of S. India. Census Report – Travancore (I9II) ]
http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-09-43-34/1592-2012-10-23-05-13-48

 "ह्याशिवाय गुलामांचाही एक वर्ग होता. अनैतिक गुन्हे केलेल्या किंवा बेवारशी स्त्रिया, मुले, पुरूष इत्यादींना गुलाम समजत. पैकी स्त्रीला कुणबीन म्हणत. ती चांगल्या आचरणाने गुलामीतून मुक्त होई. शिवशाहीत व पेशवाईत २ ते २५ रूपयापर्यत कुणबीण विकत मिळे. त्या वेळी हिंदुस्थानात गुलामांची चाल होती.
संदर्भ : http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/23-2015-01-14-06-25-27/10393-2012-07-19-09-14-43?showall=&start=18

संत कान्होपात्राला बेदरच्या बादशहाने आपली ’कुणबीन" बनवायचा प्रयत्न केला होता. तो फसला. कान्होपात्रा कुणबी जातीची नव्हती.
संदर्भ: http://medievalsaint.blogspot.in/2014/03/saint-kanhopatra.html

वरील बाब पाहता कुणबिणी/बटीक ही एक संस्था होती, त्यात विशिष्ट जातीच्याच स्त्रीया असत असे कोठेही दिसत नाही. वेश्या आणि कुणबिणीतील पहरक हा कि कुणबीण ही विकत घेतलेली स्त्री असायची. आपत्तीमुळे स्वत:हुन विकणे, विकले जाणे, पळवुन नेवुन विकणे असे प्रकार होत होते. कुणबिणी विकत घेणारे ऐपत असणारे सर्वच समाजघटक होते. एकाच विशिष्ठ जातीचे लोक कुणबिणी बाळगत  असेही दिसत नाही. किंबहुना कुणबिणी बाळगणे ही तत्कालीन प्रतिष्ठेची बाब होती. शिवकालातही कुणबिणींच्या विक्र्या होत असेही दिसते. किंबहुना ही संस्था जगभरची आहे.

आता प्रश्न हा पडतो कि कुणबीण हा शब्द आला कोठुण? "कुणबी" या कृषीवलघटकाशी हा स्त्रीवाचक शब्द आल्याने कुणब्याच्या बायका-पोरीच कुणबिणी बनत असत असा अवमानकारक अर्थ निघणे व संताप येणे स्वाभाविक आहे. पण खरेच तसे आहे काय हे कुणबिण या शब्दाबाबत दिल्या गेलेल्या माहितींत कुणबिणी या कुणब्याच्या बायका असत असा निर्देश कोठेही नाही.

* गुलाम अथवा कुणबिणी कशा केल्या जात ?

रियासतकार सरदेसाई यांनी संपादित केलेल्या पेशवे दप्तराच्या आठव्या खंडात प्रस्तुत विषयावर एक अत्यंत महत्वाचा कागद प्रसिद्ध केला आहे . १८ व्या शतकात अनेक राज्ये हिदुस्थानात , विशेषत: दक्षिणेत , उदयास आली . त्यांच्यात एकसारख्या लढाया , लष्करी मोहिमा , मुलखाची लुटालुट होत असे . धारवाडचा कागद सांगतो की -
" लढाईत कोणी पुरुषास धरीत नाहीत व गावगना लुटीचे समईहि कोणी पुरुषास धरीत नाहीत . गावगना लुटीचे समई बायकास अगर मुलीस मात्र धरून आणितात . परंतु सलुकाने देत नाहीत . बायका व मुली लुटून आणिल्या त्या कुणबिणी होतात . त्यास देशी आल्यावर विकतात . पुरुष कोणी सलुखाने बोलीकरिता देतात अथवा मातबर पाहून बोली धरून आणितात . हे काही गुलामसारखे नव्हेत . बोलीच्या खंडाचा यैवज आल्यावर सोडतात " .
 ( पेशवे दप्तर , खंड ८ , पृ.३२ )

यावरून स्पष्ट होते कि परचक्राच्या वेळी गावेच्या गावे लुटली जात , त्यावेळी स्त्रियांना व मुलींना पकडून त्यांना गुलाम म्हणून विकले जाई . पुरुषांना खंडणीच्या लोभाने पकडले जाई . खंडणी भरली कि त्यांची सुटका होई .
याशिवाय एखाद्या स्त्रीवर बदकर्म केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास तिला सरकारमार्फत ' कुणबीण ' केले जाई . धारवाडचा कागद म्हणतो -
" शुद्र वगैरे नीच जातीची स्त्री छिनाल्यास सापडली असता , तिच्या भ्रतारास आगर तिजला दंड द्यावयास सामर्थ्य नसल्यास , विशेष प्रसिधीच्या ग्रहस्ताची नसल्यास , क्वचित कोठे येखादा मक्तेचा मामलदार कुणबीण करून कोठीत ठेऊन कोणास देत होता अथवा विकीत होता . यास शास्त्र नाही . जुलमाने कुणबीण करितात . शास्त्रांत कुणबीण करावी आसे नाही . काही दंड काही प्रायश्चित आसे आहे . त्यात दंडायैवजी कुणबीण करतात जुलमाने ."
( पेशवे दप्तर , खंड ८ , पृ.३२  )

त्याकाळी भयंकर दुष्काळ पडत . हजारो , लाखो माणसे अन्नाविना तडफडून मरत . अशा वेळी आईबाप आपली मुलेमुली विकत असत . अशी मुले मुली विकत घेणार्याच्या घरी गुलाम म्हणून राहत असत . अशा मुली मोठ्या झाल्या कि त्या कुणबिणी म्हणून घरीदारी काम करत .
 ( मराठेशाहीचे अंतरंग - डॉ . जयसिंगराव पवार )

* कुणबिणींचे दोन प्रकार : खासगी आणि सरकारी

समाजातील प्रतिष्ठीत लोक आपल्या घरकामासाठी बाजारातून एखादी गृहोपयोगी वस्तू आणावी , त्याप्रमाणे कुणबीण विकत आणत असत .

सरकारी कुणबिणी म्हणजे सरकारच्या मालकीच्या अथवा सरकारच्या ताब्यात असणार्या कुणबिणी .

* गोविंद पानसरे - शिवाजी कोण होता ?

गोविंद पानसरे आपल्या ' शिवाजी कोण होता ? ' ह्या पुस्तकात Sarkar J.N . Shivaji and his times ,P.365 हा संदर्भ वापरून लिहितात -
" त्या काळात हिंदू व मुसलमान , राजेरजवाडे , इनामदार यांचा लढाईस जाताना जनानखाने , कुणबिणी व कलावंतिणी बरोबर नेण्याचा रिवाज होता . परमुलखातल्या स्त्रियांना बटकिणी बनवण्याचा अन भ्रष्ट करण्याचा परिपाठ होता . त्या काळी शिवाजी महाराजांनी सक्त हुकूम दिला होता कि ,
" मोहिमेस जाताना कुणीही बटकिणी , कुणबिणी अगर कलावंतिणीस बरोबर घेऊ नये . कुणाही स्त्रीस बटकीण बनविता कामा नये . "
( गोविंद पानसरे - ' शिवाजी कोण होता ?' - तिसावे पुनर्मुद्रण २०१२ - पृ . १५ )

* डॉ . एस एन सेन यांनी १९२८ साली लिहिलेल्या The Military System of Marathas या ग्रंथात " ब्राउटन , Letters From a Maratha Camp , pp.-112-13 " हा संदर्भ वापरून पेशव्यांच्या लष्करी मोहिमे बद्दल सांगताना लिहितो -
" खाजगी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्याबरोबर त्यांच्या बायका आणि कुणबी , तसेच नर्तिका , जादुगार , वेश्या असत . "

सध्या काही समाजद्रोही मंडळी मराठा समाजाच्या स्त्रिया म्हणजेच कुणबिणी असा अर्थ घेऊन मराठा स्त्रियांना कुणबिणी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यातून ते आपल्याच समाजातील स्त्रियांचा, आपल्या पूर्वजांचा  अपमान करत आहेत, बदनाम करत आहेत. तसेच महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना यामुळे विरोध करत असून, बाबासाहेबांना मराठा विरोधक आणि ब्राह्मण वाद पूजक ठरवत आहेत.  तरी मराठा समाजाने स्वतःच स्वतःच्या स्त्रियांचा या समाजद्रोही मंडळींच्या नादाला लागून अपमान करून घेऊ नये, आणि आपण ९६ कुळी, क्षत्रिय कुलवंत आहोत याचे भान ठेवून आपल्या स्त्रियांचा आणि पूर्वजांचा सन्मान करावा हि अपेक्षा.

<< या लेखातील संशोधन आणि लेखन हे श्री. संजय सोनवणी आणि श्री. राहुल रांजणगावकर यांनी आपल्या ब्लोग वर केलेले आहे. अधिक माहितीसाठी वाचकांनी खालील ब्लोगला भेट द्यावी हि विनंती. त्यांच्या लिंक येथे देत आहे.>>

1. http://sanjaysonawani.blogspot.in/2015/05/blog-post_7.html
2. http://jewatelte.blogspot.in/2015/05/blog-post_8.html

Thursday, 14 May 2015

देशी गाय आणि आर्थिक संपन्नतेचा मार्ग...!


महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी नुकतेच एक विधान केले, आणि त्यावर गदारोळ देखील झाला.
"राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखणे कठीणच" असे ते विधान होय.
राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करूनही शेतकरी आत्महत्या रोखण्यात कोणालाही यश आलेले दिसत नाहीये. आता महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू करून शेतकऱ्याला आणखी खड्ड्यात घातल्याचे देखील बोलले जात आहे. परंतु या आधी याविषयी लेख लिहून मी गोपालनातून आर्थिक उन्नतीचा मार्ग, असा लेख लिहून त्याविषयी माहिती देखील दिलेली आहे.
नुकतेच जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या ब्लोग वर एक लेख वाचला, त्यात त्यांनी भारतीय गायींच्या पालनातून आर्थिक दृष्ट्या संपन्न झालेल्या अशोक इंगवले यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे. लेख आवडला त्या दृष्टीने आणखी बातम्या आणि विडीओज गोळा करण्यासाठी नेट वर शोध घेतला, एक दोन बातम्या आणि एक विडिओ एवढेच हाती लागले.
याविषयी जवळ जवळ सर्व माध्यमात बातमी येण्याची अपेक्षा होती, मात्र माध्यमांनी ती फोल ठरवली.
सातारा जिल्ह्यात माण तालुका आहे, माण तालुक्यात बिदाल नावाचे गाव आहे, तेथील अशोक इंगवले यांच्या देशी गायीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीतून आर्थिक उन्नती व कोट्यावधी रुपये कमावण्याची ही कहाणी आहे.

महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि सरकारने अशा व्यक्तींच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कार्य करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून शेतकरी आत्महत्या करणार नाही.
अशोक इंगवले म्हणतात,
"शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी; पण सुरवात थोडी थोडी करावी. सेंद्रिय शेती करताना पहिल्यांदा देशी गायी घरासमोर बांधा आणि मगच सेंद्रिय शेतीला सुरवात करा. देशी गाय ही आरोग्याचे प्रतीक मानली जाते. सेंद्रिय शेती करताना शेणखताचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. ही शेती करताना तुम्ही शेतीला जास्तीत जास्त वेळ द्या. शरीराने आणि मनानेही या शेतीत रमा.. तुम्हाला निश्‍चितपणे याचा फायदा दिसून येईल. देशी गायीच्या सान्निध्यात राहिल्यास अनेक अनुकूल परिणाम दिसून येतील. शास्त्रज्ञांनीही हे मान्य केले आहे. देशी गाय पालनासाठी अत्यंत सोपी आहे. शेतकरी जसे या गायीचे व्यवस्थापन करतील तशी ही गाय राहते. यामुळे पालनपोषणाला ही गाय सहज सुलभ आहे. शेती चॅलेंज म्हणून स्वीकारा. काही कालावधीनंतर त्याचे अनुकूल परिणाम आपोआप दिसतील."
भारतीय गायीचे मोल ब्राझिलसारख्या दक्षीण अमेरिकन देशाला उमगले असून, त्याच्यासह अनेक पुढारलेले देश  भारतीय देशी गायीच्या पैदाशीच्या मागे धावत असल्याची माहिती अशोक पोटतिडकीने देतो.
कृषी पदवीधर असलेल्या अशोकने नोकरीच्या मागे न लागता स्वतःची शेती करण्याचा निर्णय घेतला, सुरुवातीला आधुनिक पद्धतीने शेती केली मात्र त्यातून तोटाच तोटा झाल्याने तो देशी गायींच्या सहाय्याने सेंद्रिय शेतीकडे वळला आणि आज कोट्यावधी रुपयांचा मालक झाला आहे. आणि हे सर्व अशोकने केले ते माण सारख्या दुष्काळी भागात, हे विशेष होय.
महाराष्ट्र आणि भारतीय शेतकऱ्यांनी जर्सी अथवा इतर परदेशी गायींच्या मागे न लागता देशी गायी पाळणेच हितकारक आहे असे यातून स्पष्टपणे दिसते आहे. सरकारने आता देशी गाय संवर्धनासाठी उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. याविषयीची अधिक माहिती खालील विविध लिंक वरून मिळू शकेल.



Wednesday, 13 May 2015

बाबासाहेब, हिंदू कोड बिल आणि मनुस्मृती...!


बाबासाहेबांनी आपल्या पूर्वायुष्यात मनुस्मृतीचे दहन केले हे सर्वांनाच माहित आहे. पण पुढे बाबासाहेबांनी तिच्याविषयी गौरवोद्गार काढले आणि तिचा आधार घेऊनच हिंदू कोड बिल बनवले हे कुणालाच माहित नसते.माहित असलेले लोकही राजकीय सोयीसाठी गप्प बसतात.दिनांक २४ फेब्रुवारी १९४९ रोजी संविधान निर्माती सभेसमोर केलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले:-
“ज्या १३७ लोकांनी स्मृती लिहिल्या त्यामध्ये मी उल्लेखिलेल्या याद्न्यवल्क्य व मनू या स्मृती वरच्या दर्जाच्या आहेत.दोघांनीही मुलीचा चौथ्या हिश्श्यावर अधिकार आहे असे म्हटलेले आहे.
[मनुस्मृती,अध्याय ९,स्लोक ११७:-
स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक।
स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव:॥
अर्थ:-सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करे। ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.]
बाबासाहेब पुढे म्हणाले-कोणत्याही कारणाने का असेना पण रूढीने त्या ग्रंथाचा अधिकार नष्ट केला ही खेदजनक गोष्ट आहे. नाहीतर स्मृतीच्या आधारावर मुलीला चौथा हिस्सा हक्काने मिळाला असता.
प्रिव्ही कौन्सिलने दिलेल्या निर्णयाचा मला फार खेद वाटतो.त्याने आमच्या कायद्याच्या सुधारणेचा मार्ग बंद केला. आधीच्या एका प्रकरणात प्रिव्ही कौन्सिलने म्हटले आहे की कायद्यावर रूढी मात करते.त्यामुळे आमच्या न्यायाधीशांना आमच्या पुरातन ऋषींनी आणि स्मृतीकारांनी काय कायदे केले होते याचा शोध घेणे अगदी अशक्य झाले.
रूढी कायद्यावर मात करील असा प्रिव्ही कौन्सिलने निर्णय दिला नसता तर एकाद्या कायदेपंडिताला अगर एकाद्या न्यायाधीशाला याद्न्यवल्क्य स्मृती आणि मनुस्मृती प्रकाशात आणणे सहज शक्य झाले असते.आणि स्त्रियांना आज अधिक नसला तरी संपत्तीचा चौथा हिस्सा तरी उपभोगता आला असता.याबद्दल मला मुळीच शंका नाही.”
[रायटिंग ऐण्ड स्पीचेस,खंड १४वा,पान क्र.२५५वर सुरु होणारे भाषण]
११जानेवारी १९५० ला मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालयाच्या संसदेसमोर बोलताना बाबासाहेब म्हणाले की मी जातिनिर्णयासाठी मनूचा, घटस्फोटासाठी पाराशर स्मृतीचा, स्त्रियांच्या हक्कासाठी बृहस्पतीच्या स्मृतीचा आधार घेतला आहे. दायभाग पद्धतीच्या वारसा हक्कासाठी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे.
[समग्र भाषणे,खंड ८-पान क्र.१७-१८/जनता,१४-१-५०]
समाजशास्त्रीय दृष्ट्या बौद्ध,जैन व शीख हे हिंदूच असल्याचे प्रतिपादन बाबासाहेबांनी ६ फेब्रुवारी १९५१ ला संसदेत केले.[जनता,१०-२-१९५१]
दि.२५ डिसेम्बर १९५२ रोजी राजाराम चित्रपटगृहात बोलताना बाबासाहेब म्हणाले:-
“माझ्या बिलाच्या टीकाकारांनी ते हिंदू धर्मशास्त्रास सोडून आहे अशी टीका केली. पण तसे म्हणणार्यांना माझे आव्हान आहे की मनुस्मृतीचा आधार नाही असे त्यात कोणते कलम आहे ते त्यांनी दाखवून द्यावे.
एखादी स्त्री वारल्यास तिची संपत्ती तिच्या मुलीलाच मिळाली पाहिजे हा माझा हटवाद आहे.बाप मेल्यावर भाऊ-भाऊ बापाच्य संपत्तीची वाटणी करून घेतात .त्या भावाबरोबर त्यांच्या बहिणीलाही का वाटणी मिळू नये?[जनता,३जानेवारी१९५३]

बाबासाहेबांच्या म्हणण्याचा आधार असलेले मनुस्मृतीतील श्लोक:-
अध्याय ९मधील हे सर्व श्लोक आहेत:-
श्लोक ११७:-
स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक।
स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव: ॥
अर्थ:-सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करें। ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.
श्लोक १२९-
यथैवात्मा तथा पुत्र: पुत्रेण दुहिता समा ।
तस्यामात्मनि तिष्ठ्यंत्यां कथमन्योधनं हरेत ॥
अर्थ:-मनुष्य भी पुत्र रूप में जन्म लेता है और कन्या भी पुत्रतुल्य होती है.तो फिर कन्या के रहते हुए पुत्र का धन पराए लोग कैसे ले सकते है?
श्लोक १३०:-जो धन माता के द्वारा जोडा जाता है,वह पुत्री का ही होता है.
श्लोक १३२-मुलाच्या मुलांत आणि मुलीच्या मुलात काहीच भेद नाही.
श्लोक १३८-मुलाच्या आणि मुलीच्या मुलांत भेद करू नये.
श्लोक८९-ऋतुमती झाल्यानंतर पित्याने ३ वर्षाच्या आत वर निवडला नाही तर मुलीने स्वत:चा वर स्वत: निवडावा.
श्लोक १२-ज्या स्त्रिया स्वत:ची रक्षा स्वत: करतात त्या अधिक सुरक्षित असतात.
श्लोक१९१-सभी भाई तथा बहनें मां की मृत्यू के बाद उसकी संपत्ति अपने बीच समान रूप से बांट ले.
श्लोक १९२-पुत्रियों की अविवहित कन्याओं को भी नानी के धनसे प्रेमपूर्वक थोडा-बहुत धन प्रदान करना चाहिए.
श्लोक १९३-सहा प्रकारची स्त्री धने आहेत:-
१.विवाच्या वेळेस आईवडिलांनी दिलेले.
२.वेगवेगळ्या समारंभाच्या वेळीस माहेरी बोलावून दिलेले.
३.नवर्याने भेट म्हणून दिलेले.
४.वडिलांनी दिलेली.
५.आईने दिलेले.
६.भावाने दिलेले.
श्लोक १९४:-या स्त्रीधनावर तिच्या मुलांचा अधिकार आहे पण नवर्याचा नाही.
आर्यसमाजी पंडित गंगाप्रसाद उपाध्याय म्हणतात:-ज्या वाईट तत्वांनी हिंदू धर्मावर आक्रमण केले त्याच वाईट तत्वांनी मनुस्मृतीत प्रक्षिप्त श्लोक घुसवले.या प्रक्षिप्त स्लोकांसाठी मनुस दोषी ठरवता येणार नाही.
राजर्षि शाहू महाराजांना प्रिय असलेल्या सत्यार्थप्रकाश ग्रंथात मनुस्मृतीतले ५१४ श्लोक आहेत,जे समतावादी आणि अंधश्रद्धारहित आहेत.
या संदर्भात डा.बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सोहनलाल शास्त्री यांनी एक मजेशीर आठवण सांगितली आहे. ते म्हणतात:-“बाबासाहेबांनी मला एके दिवषी बोलावले आणि सांगितले की माझ्या हिंदू कोड बिलातील कलमांना शास्त्रीय आधार शोधणारा एखादा आर्यसमाजी पंडित शोधून काढ.या कामासाठीआपण त्याला मानधनही देऊ.गुरुकुल कांगडीचे संस्कृत विद्वान स्नातक रामगोपाल विद्यालंकार यांना मी भेटलो.त्यांनी मला पंडित धर्मदेव विद्यालंकार यांना भॆटावयास सांगितले व ते संशोधनपर लेख आपल्या अर्जुन या नियतकालिकात छापण्याचे आश्वासनही दिले.त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलास स्मृतींचा आधार दाखवणारी लेखमाला ’वीर अर्जुन’मध्ये प्रकाशित झाली.बाबासाहेबांनी स्वत: ते लेख वाचले.आणि माझ्या करवी पं.विद्यालंकार यांना पाचहजार रुपयांचे मानधनही या संदर्भात डा.बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सोहनलाल शास्त्री यांनी एक मजेशीर आठवण सांगितली आहे. ते म्हणतात:-“बाबासाहेबांनी मला एके दिवशी बोलावले आणि सांगितले की माझ्या हिंदू कोड बिलातील कलमांना शास्त्रीय आधार शोधणारा एखादा आर्यसमाजी पंडित शोधून  काढ. या कामासाठी  आपण  त्याला  मानधनही  देवू. गुरुकुल कांगडी चे संस्कृत विद्वान स्नातक रामगोपाल विद्यालंकार यांना मी भेटलो. त्यांनी मला पंडित धर्मदेव विद्यालंकार यांना भेटावयास सांगितले व ते संशोधनपर लेख आपल्या अर्जुन या नियतकालिकात छापण्याचे आश्वासन ही दिले. त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलास स्मृतींचा आधार दाखवणारी लेखमाला 'वीर अर्जुन' मध्ये प्रकाशित झाली. बाबासाहेबांनी स्वतः ते लेख वाचले आणि माझ्याकारावी पं. विद्यालंकार यांना ५००० रुपयांचे मानधनही पोहचते केले." {पान क्र. ८६-८७-२०१० ची आवृत्ती, बाबासाहब डा. आंबेडकर के संपर्क में २५ वर्ष, सोहनलाल शास्त्री, सम्यक प्रकाशन}
<< साभार >>

Sunday, 10 May 2015

शिवशाहीर...!

जेष्ठ शिव चरित्रकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र शासनाने नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. एका सच्चा शिवराय भक्ताला, त्यांच्या कार्याला मिळालेला हा पुरस्कार उल्लेखनीय आणि समर्थनीय आहे. परंतु काही मंडळी बाबासाहेबांना हा पुरस्कार देण्यावरून स्वार्थी विरोध करण्यात मश्गुल आहेत. या मंडळींना ब्राह्मण समाजातील व्यक्तींचा विरोध करण्याशिवाय दुसरे कोणतेही विधायक काम नसल्याने हे लोक सध्या आदरणीय बाबासाहेबांना विरोध करत आहेत. परंतु शिवराय, राजमाता जिजाऊ आणि मराठा समाजाची जेवढी बदनामी या लोकांनी केली असेल त्याला तोडच नाही.
अवघ्या विश्वाला वंदनीय असणाऱ्या छत्रपति शिवरायांना याच लोकांनी एका जातीत बंदिस्त केले, हे कार्य समर्थनीय म्हणायचे काय.?
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र घराघरात पोचवले असे म्हटले जाते. आता सात समुद्रापार देखील जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग होत आहेत. परंतु ज्यांचे स्वार्थच इतरांवर टीका करण्यावर अवलंबून आहेत ते पुरंदरेंना विरोध करणारच. यांचा विरोध पाहून असे वाटते की, शासनाने महाराष्ट्र भूषणच नव्हे तर प्रत्येक पुरस्कार देताना या समाजद्रोही लोकांना विचारूनच पुरस्कार द्यायला हवा की काय.? यांचा विरोध हा सर्व ब्राह्मण समाजाला आहे. यांना ब्राह्मण समाजाने केलेले उत्तम कार्य कधीही दिसत नाही.
बाबासाहेबांच्या लिखाणावर यांनी केलेले आरोप हे केवळ जातीय द्वेषातून केलेले आहेत आणि त्यांना कोणताही संदर्भ नाही. हे लोक इतिहास वाचताना संदर्भासहित न वाचता केवळ जातीय द्वेषातूनच वाचताना दिसतात. तसेच यांचा आणखी एक अट्टाहास असतो तो म्हणजे, "आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा" अर्थात आम्ही जो कल्पनाविलास करून जातीय द्वेषातून इतिहास लिहू तोच सर्वांनी खरा मानावा. या लोकांशी कोणीही चर्चा करू शकत नाही. कारण हे आपल्या पुस्तकात कत्तली करण्याचेच आवाहन करतात. हि मंडळी कायम इतरांना आरोपी म्हणूनच पुढे आणतात, समोरील व्यक्तीवर कसलाही संदर्भ न घेत गलिच्छ आरोप करायचे, इतिहासाचे आणि राष्ट्र पुरुषांचे विकृतीकरण करायचे हाच एक कलमी कार्यक्रम यांनी आता पर्यंत केलेला आहे. यांची वृत्तीच मुळी हम करे सो कायदा अशी आहे त्यामुळे इथे मतभेदांना अजिबात किंमत नाही.
बाबासाहेबांच्या लिखाणातील कुणबिणी या शब्दामुळे कुणबी समाजाचा अपमान होतो असे हि मंडळी म्हणत आहेत. मात्र इतिहास, भाषा, ऐतिहासिक संदर्भ आणि त्या त्या काळातील सामाजिक परिस्थिती याची कसलीही माहिती असूनही मान्य न करणारी ही जमात सारे काही जातीय चष्म्यातूनच पाहताना दिसते. कुणबीण
या शब्दाचा अर्थ देह विक्रय करणारी स्त्री अशा अर्थाने वापरात होता. कुणबीण म्हणजे कुणबी जातीची स्त्री नव्हे. कुणबीण या कोणत्याही जातीतील समाजातील स्त्रिया असत. तसेच पुरंदरेंच्या लेखनात मुस्लिम द्वेष आहे असाही आक्षेप ही समाजद्रोही मंडळी घेत आहेत. परंतु बाबासाहेबांनी मुस्लिम द्वेष या पुस्तकातून दाखवलेला नाही तर शिवरायांचे शत्रू मुस्लिम होते म्हणून तो शत्रुविरोध आहे. आता शत्रू मुस्लिम असेल तर तो दोष बाबासाहेबांचा म्हणायचं काय.? ब्राह्मण समाजाचा उदो उदो या पुस्तकात  केल्याचा  आणखी एक अपप्रचार हि मंडळी करत आहेत मात्र या  पुस्तकात ब्राह्मण समाजाच्या तत्कालीन दोषांवर भरघोस टीका केलेली आढळते.
बाबासाहेब पुरंदरे हे काही इतिहास संशोधक  नाहीत  असे त्यांनी स्वतः देखील सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी शिवचरित्र लिहिताना उपलब्ध ऐतिहासिक साधने, पुरावे, संदर्भ यांच्या सह हे पुस्तक लिहिले आहे, जर या समाज द्रोही लोकांना हे पटत नसेल तर त्यांनी स्वतः इतिहास संशोधन करावे. स्वतः खरा इतिहास लिहावा.
परंतु जे शिवराय आणि जिजाऊ साहेब यांचे नाव घेऊन विशिष्ट समाजातील स्त्रियांचा गलिच्छ भाषेत यथेच्छ अपमान करणारे व त्या समाजाच्या कत्तली करण्याचे उपाय सांगणारे इतिहास काय शोधणार. हे लोक केवळ आणि केवळ द्वेषच करतील.
जेम्स लेन प्रकरणी देखील बाबासाहेबांनी ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी प्रेसला पत्र लिहून लेनचे पुस्तक मागे घेण्यासाठी विनंती केली होती. त्यामुळे तो आरोप देखील निराधार आहे. तसेच लेनला पुस्तक लिहिण्यासाठी बाबासाहेबांनी मदत केली असे जे सांगितले जाते ते खरे नाहीच. कारण लेनच्या पुस्तकात ब्राह्मण समाजावर देखील टीका केलेली आहे, आणि जर बाबासाहेब ब्राह्मणवादी असतील तर ते अशा पुस्तकाला कसे काय साहाय्य करतील.?

शेवटी एवढेच  सांगावेसे  वाटते  की नव्वदी पार केलेल्या एका शिवभक्ताच्या वयाचा जराही विचार न करता केवळ जातीय द्वेषातून विरोध करणारे यातून शिवरायांचा देखील अपमान करत आहेत. समाज यांना आता विचारात नाहीच, आणखी काही दिवसात हि मंडळी देखील इतिहास जमा होऊन जातील हे निश्चित...!

अधिक माहिती येथे मिळेल:
1.  http://sanjaysonawani.blogspot.in/2015/05/blog-post_6.html
2.  http://harinarke.blogspot.in/2015/05/blog-post.html
3.  http://jewatelte.blogspot.in/2015/05/blog-post_8.html
4.  http://drabhiram.blogspot.in/2015/05/blog-post_6.html