Sunday, 4 December 2016

ममतांचा थयथयाट

दि. ५ डिसेंबर २०१६च्या दै. 'मुंबई तरुण भारत'मधील माझा वेध...!
***
ममतांचा थयथयाट

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला आणि सुरुवातीला पाठिंब्याची की समर्थनाची भूमिका घ्यावी, या गोंधळात हरवलेल्या विरोधकांत मात्र नंतर याविरोधात जणू काही आरोप करण्याची स्पर्धाच लागली. संपूर्ण दिल्लीत चिकनगुनिया, डेंग्यूच्या साथीने आणि नंतर वायुप्रदूषणाने धुमाकूळ घातलेला असताना दिल्लीबाहेर भटकणारे आणि न्यायालयाने खडसावल्यानंतर जागे झालेले केजरीवाल मग या राष्ट्रीय प्रश्नावर भलतेसलते बरळले तर केजरीवालांची दुसरी आवृत्ती म्हणाव्या अशा ममता बॅनर्जीही मोदींविरोधातल्या स्वार्थी मैदानात उतरल्या. नोटाबंदीनंतर या निर्णयाला पहिला विरोधही ममतांनीच केला होता. शारदा चिट फंड घोटाळ्याच्या चिखलात ज्यांचे हात बरबटल्याचा आरोप आहे, त्या गरीबांच्या नावाने थयथयाट करू लागल्या. प. बंगालमध्ये महामार्गावर, टोलनाक्यांवर चाललेल्या लष्कराच्या नैमित्तिक कार्यावर त्यांनी आक्षेप घेतला, यात त्या एवढ्या पुढे गेल्या की, त्यांनी थेट लष्करावर राज्य सरकार उलथवून टाकण्याचा अश्लाघ्य आरोप केला. जे लष्कर आपल्या स्थापनेपासून सीमेवरच नव्हे तर कोणत्याही आपत्तीत देशातील नागरिक आणि लोकशाहीच्या रक्षणाची भूमिका आपल्या प्राणांचे बलिदान देऊनही पार पाडत आले त्यावर असला बिनबुडाचा आणि घाणेरडा आरोप करून ममतांनी लष्कर आणि लोकशाही व्यवस्थेत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत देशात मोहोळ उठवून दिले. याप्रकरणी लष्करानेच स्पष्टीकरण दिल्यानंतर मात्र ममता चांगल्याच तोंडावर आपटल्या. नोटाबंदीच्या विरोधात ममता बॅनर्जींचा प्रत्येक आरोप त्यांच्याविषयी लोकांच्या मनात संशय निर्माण करणारा ठरला. नोटाबंदीमुळे खरे तर पाकिस्तान, बांग्लादेश येथून येणारा बनावट नोटांचा खजिना मातीमोल झाला. यामुळे दहशतवाद्यांची आणि नक्षलवाद्यांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली. परंतु, या चांगल्या आणि देशहितकारक परिणामांकडे न पाहता ममता अधिकच आक्रमक होत गेल्या, त्यातूनच त्यांनी राष्ट्रपतींचीही भेट घेतली, ज्याला शिवसेनेनेही अविचारी साथ दिली. ममतांच्या या रोषामागे मात्र दुसरेच एखादे कारण असण्याचीही दाट शक्यता आहे. बंगालमध्ये बेकायदेशीरपणे राहणार्‍या आणि ममतांची व्होटबँक असणार्‍या हजारो बांगलादेशींच्या मुळावर तर हा निर्णय आला नसेल ना? बांगलादेशातून येणार्‍या बनावट नोटा केवळ कागदाचा तुकडा झाल्याने तर हा तडफडाट होत नसेल ना? याआधी बंगाल राज्य सरकारच्या आणि तृणमूल कॉंग्रेसच्या काही नेते आणि आमदार-खासदारांवर बनावट नोटांच्या व्यापारात हात असल्याचे आरोप झालेले आहेत, त्यामुळे गरीबांच्या नावाखाली या बनावट पैशाने आपल्या ज्या सहकार्‍यांचे हात माखले होते, त्यांच्यासाठी तर ममतांचा हा आक्रोश नसेल ना? साधी राहणी अशी ओळख असलेल्या ममतांच्या राज्यात जिहादी विचारसरणीच्या घुसखोरांकडील पैशाचा ओघ आटल्याने तर ही आगपाखड नसेल ना? असे अनेक प्रश्न त्यांच्या आरोपांमुळे निर्माण होतात. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांनी ममतांचे खरे रूप कळल्याने त्यांच्या आरोपांना काडीचीही किंमत दिली नाही.

एकीकडे मोदीद्वेषाने फणफणलेल्या ममता बॅनर्जी तर दुसरीकडे कॉंग्रेससह अन्य लोक नोटाबंदीच्या विरोधात ’कार्यकर्ता आक्रोश’ करत रस्त्यावर उतरले, मात्र त्यांना जनपाठिंबा काही मिळाला नाही, उलट त्यांचे चांगलेच हसेही झाले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींचे सर्वच विरोधक इमानेइतबारे आपली राजकीय मक्तेदारी बचावण्यासाठी विचार वगैरे खुंटीवर टांगून एकत्र आले आणि आरोपांचे सत्र सुरू झाले. मात्र या निर्णयाने भविष्यात देशाला आणि पर्यायाने देशातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे ते सोयीस्कररित्या विसरले. मोदींच्या ध्येयातील कॅशलेस-डिजिटल अर्थव्यवस्था साकारल्यानंतर अनेक अवैध धंदे, भ्रष्टाचार, लाचखोरी थांबणार असल्याने देशातील नागरिक-मतदार पुन्हा पुन्हा मोदी आणि भाजपलाच मते देणार. त्यामुळे मग आपली पिढ्यान्‌पिढ्यांची राजकीय दुकानदारी मोडीत निघण्याचा धसका या लोकांनी घेतल्याचे त्यांच्या प्रत्येक कृत्यावरून स्पष्ट होत आहे. तसेच मोदींचा हा नोटाबंदीचा निर्णय यशस्वी झाल्यास आपल्याला कायमचेच विरोधात बसावे लागेल आणि मग आपल्या अनेक पिढ्यांचे भवितव्य अंधारात जाईल, यामुळेही हा गरीबांच्या नावाने मगरीचे अश्रू ढाळण्याचा प्रकार होत असेल. एवढेच नव्हे तर ३ वर्षांपूर्वी अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराविरुद्ध छेडलेल्या आंदोलनात भ्रष्टाचार्‍यांच्या विरोधात पोटतिडकीने बोलणारे आज या दांभिकांची तोंड फाटेस्तोवर वकिली करताना दिसले. अर्थात मोदीद्वेषाची लागण झाल्यानेच त्यांच्या मुखातून अशी मळमळ बाहेर पडली. या सर्वात बिहारचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदींचे राजकीय विरोधक असलेल्या नितीशकुमार यांनी मात्र नोटाबंदीच्या निर्णयाचे जाहीर समर्थन करत सर्वांनाच धक्का दिला आणि ज्यांना याचा त्रास झाला त्यांनी फुकाचा कल्लोळ केला. नोटाबंदीनंतर नागरिकांना नव्या नोटा मिळण्यात, व्यवहार करण्यात, खरेदीसाठी जरी अडचणी येत असल्या तरी त्यांचा मोदींना पूर्ण पाठिंबा असल्याचे आतापर्यंत दिसले आणि यापुढेही तो पाठिंबा तसाच राहिल हे नक्की. देशातील नागरिक सुज्ञ असल्याने आणि त्यांच्याकडे अजस्त्र असा काळा पैसा नसल्यानेच ते मोदींचे समर्थन करत आहेत आणि ज्यांच्याकडे काळ्या पैशाच्या राशीच्या राशी आहेत ते मात्र मोदींना शिव्याशाप देत आहेत.
 
- महेश पुराणिक

No comments:

Post a Comment