Sunday, 24 April 2016

कन्हैया नावाचे साम्यवादी खेळणे

कन्हैया कुमारच्या उदयाने देशातील गलितगात्र झालेली अनेक धेंडे हुरळून गेली आहेत. कित्येक वर्षांत ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वाने काही करता आले नाही किंवा जनतेच्या मनात स्थान मिळवता आले नाही त्यांना आता कन्हैया आपला मसीहा वाटत आहे. कन्हैया जे बोलतो त्याला तरुणाईचा वाढता प्रतिसाद मिळता असल्याचे दिसत आहे, त्यामुळे पुढील निवडणुकीत कन्हैया कुमारमुळे आपल्या पक्षाचे सरकार यावे यासाठी त्याला पाठींबा देण्याचीही सध्या अहमहमिका सर्व पक्षात लागली आहे. परंतु कन्हैया काय बोलतो, त्याची घडण कोणत्या वैचारिक धारेत झाली आहे याचे कोणालाही कसलेही घेणे देणे नाही. केवळ त्याच्यामुळे आपल्याला सत्तेचा मलिदा खायला मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा झाली आहे. याआधी ज्यांनी साम्यवादाला विरोध केला तेही कन्हैयाच्या मुखी असलेले साम्यवादाचे नाव ऐकून आनंदाने डोलत आहेत. अहिंसा आणि साम्यवाद : कन्हैया कुमार त्याच्या भाषणात अहिंसेचा कैवारी असल्याच्या थाटात बोलत असतो. परंतु साम्यवादी नेत्याला (?) आपल्या विचारधारेने जगात जेवढी हत्याकांडे आणि हिंसा केली असेल तेवढी कोणीही केली नसेल, याचीही माहिती नसेल काय? रशियन राज्यक्रांती मध्ये ३० लक्ष नागरिकांची हत्या करण्यात आली. चीन मध्ये साम्यवादी राजवटीने ६५ लक्ष नागरिकांची हत्या केली. व्हिएत्नाम मध्ये १० लक्ष, उत्तर कोरिया मध्ये २० लक्ष, कंबोडिया मध्ये २० लक्ष, पूर्व युरोपीय राष्ट्रात १० लक्ष, दक्षिण अमेरिकेत १.५ लक्ष, आफ्रिकेमध्ये १०.७ लक्ष, अफगानिस्तान मध्ये १.५ लक्ष आणि इतर साम्यवादी चळवळीत १० हजार पेक्षा जास्त नागरिकांची हत्या करण्यात आली. डॉ. आंबेडकर आणि साम्यवाद : आंबेडकरांचे नाव घेऊन साम्यवाद खपवू पाहणाऱ्या कन्हैयाला कदाचित आंबेडकरांचा साम्यवादाला असलेला प्रखर विरोध माहिती नसावा किंवा माहिती असूनही तो आपल्या स्वार्थासाठी आंबेडकरांचा आणि साम्यवादाचा संबंध लावत असेल. पण आंबेडकरांची साम्यावादाबाबत असलेली भूमिका सर्वांसमोर आणणे आवश्यक आहे. 'मी कम्युनिस्टांशी संबंध ठेवणे सुतराम् शक्य नाही. मी कम्युनिस्टांचा वैरी आहे. कम्युनिस्ट हे आपल्या राजकीय ध्येयसिद्धीसाठी कामगारांना राबवीत असतात.’ (धनंजय कीर कृत डॉक्टरांचे चरित्र – पान ३०८) ‘बुद्ध हाच कार्ल मार्क्सला पूर्ण उत्तर आहे. ज्या बौद्ध राष्ट्रांनी साम्यवादाचा स्वीकार केला, त्यांना साम्यवाद म्हणजे काय हे समजत नाही. रशियन साम्यवाद उद्देश रक्तरंजित क्रांती घडवून आणणे हा आहे… रशियाच्या जाळ्यांत उडी घेणाऱ्या आग्नेय आशियातील राष्ट्रांनी सावधगिरी बाळगावी… दारिद्र्य सर्वत्र आहे व पुढेही राहील. रशियातही दारिद्र्य आहे. मानवी स्वातंत्र्याचा बळी देण्यासाठी दारिद्र्याची सबब सांगू नये.' रशियाकडे पाहा, तो राष्ट्रीय स्वातंत्र्यदानाचे आमिष दाखवून लोकांना घशांत घालीत आहे… रशियाने स्वतंत्र केलेल्या देशात गुलामगिरी येते. त्यापासून स्वातंत्र्य येत नाही…! साम्यवाद व लोकशाही एकत्र नांदू शकणार नाहीत असे आंबेडकरांचे मत होते. कारण साम्यवाद म्हणजे अरण्यातील वणवा आहे. जे जे त्याच्या मार्गात येईल, त्याचा विध्वंस करीत, स्वाहा करीत तो जातो. त्या वणव्याचा आसमंतात असणाऱ्या देशांना मोठा धोका उत्पन्न झाला आहे. भारत, मोदी राजवट आणि कान्हैयाचे प्रश्न : कन्हैया कुमार त्याच्या भाषणात रोजगाराची मागणी करतो, त्याचवेळी आमचा विरोध भांडवलशाहीला आहे असेही म्हणतो. सध्या देशात कारखाने, कंपन्या अर्थात भांडवलशाही शिवाय रोजगाराची निर्मिती होऊ शकत नाही हे निखळ सत्य आहे. कारण साम्यवादाच्या परिभाषेत देशातील सर्व उद्योग सरकारने करावेत अशी अपेक्षा असते. पण, आज देशातल्या सरकारी उद्योगांची अवस्था पहिली तर ते शेवटच्या घटका मोजत असल्यासारखे दिसतात. कारण ते उद्योग चालवायला सरकारकडे पैसा नाही. उद्योग चालत नाही त्यामुळे त्यातील कामगारही बेरोजगार होणार. त्यामुळे रोजगार हवा असेल आणि देशाच्या विकासासाठी पैसा हवा असेल तर भांडवलशाही आवश्यक आहे, त्याशिवाय रोजगार निर्मिती होऊ शकत नाही. देशातील अनेक प्रश्न हे गेल्या ६५-७० वर्षातील आहेत, त्यामुळे २ वर्षांच्या मोदी राजवटीमध्ये ते सर्व प्रश्न सोडवले जाण्याची अपेक्षा करणे मुळातच अयोग्य आहे. कारण आपला देश काही जपान, इटली किंवा जर्मनी सारकाही पिटुकला देश नाही तर खंडप्राय देशाच्या समस्या निवारण करण्यासाठी तेवढा वेळाही द्यावा लागेल. जन धन योजना, स्टार्ट अप, स्टेण्ड अप इंडिया, मेक इन इंडिया या योजनेतून सरकार आपले काम करत आहे. चीन आणि अमेरिकेला मागे टाकून यावर्षी भारताने तब्बल ६३ अब्ज डॉलर ची गुंतवणूक खेचून आणली आहे. यातून रोजगारनिर्मिती होणारच आहे. ज्या गावांना विजेची सोय नव्हती तिथेही वीजजोडणी देणे सुरूच आहे. कन्हैयाने त्याच्या भाषणात शिक्षणावरील खर्च कमी केल्याचे म्हटले आहे. पण, आयआयटीमध्ये SC-ST मुलांना मोफत शिक्षण देण्याच्या निर्णयाचा उल्लेख केला नाही. तसेच देशातील शैक्षणिक संस्थेत सरकार आपल्या विचारांच्या लोकांना बसवत असल्याचेही कन्हैया आपल्या भाषणात म्हणाला. जेव्हा सरकार बदलते त्यावेळी आपल्या विचारांची माणसे सर्वत्र नेमली गेली आहे, हा या देशाचा इतिहास आहे. आणि जनतेने मोदिना त्यांची विचारसरणी पाहूनच निवडून दिले आहे, त्यामुळे त्यांच्या विचारांचीच माणसे नेमली जाणार हे उघड आहे. तरीही त्याला विरोध करणे हेच खुळेपणाचे लक्षण होय. - महेश पुराणिक

1 comment: