Monday, 19 September 2016

इथे ओशाळला मृत्यू

दि. २९ ऑगस्ट २०१६ च्या दै. 'मुंबई तरुण भारत'मधील माझा वेध...!
***
ओडिशातील कालाहांडी या अत्यंत मागास जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयाने ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून न दिल्याने दानू मान्झी या व्यक्तीला सुमारे १० किमीपर्यंत पत्नीचा मृतदेह खांद्यावर वाहून नेण्याची दुर्दैवी वेळ आली. ही घटना ताजी असतानाच सरकारी अनास्थेचा आणखी एक भेसूर चेहरा ओडिशातच पाहायला मिळाला. ३० किमी लांब असलेल्या रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता मृतदेह नेण्यासाठी ऍम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने मृतदेहाचे सांधे मोडून रेल्वेतून प्लॅस्टिकच्या बॅगेमध्ये घालून घेऊन जाण्याचा प्रकार येथे घडला. या दोन्ही घटनांतून सरकारी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर यांच्या असंवेदनशीलतेचा प्रत्यय अवघ्या देशाला आला. सरकारी रुग्णालयात अशा माणूसकीशून्य घटना नेहमीच घडत असतात, मात्र या दोन्ही घटना त्याची परिसीमाच म्हणायला हव्यात. यातून सरकारी वैद्यकीय क्षेत्राला जडलेला अमानवीयतेचा आजार कधी बरा होणार हा प्रश्नदेखील उपस्थित झाला. सरकारी रुग्णालये म्हणजे उद्धट व्यवहार करणारे कर्मचारी, सदैव उडवाउडवीची उत्तरे देणारे डॉक्टर, गोळ्या औषधांचा चोरटा बाजार, हे रोजचेच झाले आहे. त्यामुळे अव्यवस्थेचा हा प्रकार बंद होण्याची नितांत आवश्यकता असल्याचेही या घटनांतून स्पष्ट झाले. ओडिशा सरकारने यावर्षीच मृतदेह वाहून नेण्यासाठी महापरायण योजना सुरू केली होती. मात्र, नेहमीप्रमाणे गाजावाजा करून सुरू केलेल्या बर्यावचशा योजना या कागदावरच राहत असल्याचे ढळढळीत सत्यही या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या प्रकरणाची जिल्हाधिकार्यांतनी चौकशी देखील केली आणि रुग्णालय प्रशासनाला लगोलग क्लीनचिटही देऊ केली, यावरून ही चौकशी केवळ फार्सच असल्याचे उघड झाले. दुसरीकडे शवविच्छेदनासाठी रुग्णालयात मृतदेह सहजतेने वाहून नेता यावा म्हणून त्याचे सांधे मोडण्यात आले. ही सरकारी कारभाराने त्या कुटुंबियांची केलेली क्रूर थट्टाच म्हणायला हवी. यातून ओडिशातील आरोग्यसेवा किती मोठ्या प्रमाणात मरणासन्न झालेली आहे हे समजते. त्यामुळे आधी अशा आरोग्यसेवेचीच शस्त्रक्रिया करणे गरजेचे झाले आहे. यासाठी सरकारप्रमाणेच, सामाजिक संस्था, डॉक्टर, परिचारिका यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करायला हवेत, तसेच रुग्णालयातील भ्रष्टाचाराला आळा घालावा लागेल. तरच परिस्थितीने गांजलेल्या आणि प्रशासनाने नागवलेल्या सामान्य नागरिकांचे आरोग्य उत्तमराहू शकेल आणि त्यांच्यावर अवहेलना होण्याची वेळ येणार नाही.
***
पर्यावरणपूरक उत्सव
येत्या ५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रासह सर्वत्र भक्तांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होत असून त्यानंतर लगेचच प. बंगालसह सगळीकडे दुर्गापूजेचा उत्सव साजरा होणार आहे. याच दोन्ही उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ’मन की बात’ कार्यक्रमातून हे उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. ’’आपण आपल्या जुन्या परंपरेनुसार चिकणमातीच्या मूर्त्या का बनवत नाही?,’’ असा सवाल करत त्यांनी मातीच्या मूर्त्यांमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात रक्षण होईल, असे सांगितले. पर्यावरण आणि समुद्राची काळजी घेणे ही सुद्धा एकप्रकारची पूजाच आहे असेही मोदींनी सांगितले. खरेतर गेली अनेक वर्षे पारंपरिक उत्सवांचे स्वरूप पालटले असून त्याला बाजारूपणा प्राप्त झाला आहे. मग तो दहीहंडी उत्सव असो की, गणेशोत्सव अथवा दुर्गापूजा. गणपतीच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि सिंथेटिक रंग वापरून तयार केलेल्या मूर्तीच्या विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. या मूर्तींमुळे पाण्यातील जलचरांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊन काहीवेळा त्यांचा मृत्यूही होतो. तसेच या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने विहिरी, नद्या, नाल्यांतील पाणी आटल्यानंतर त्या उघड्या पडतात, त्यामुळे त्यांची आपल्याकडून विटंबनाही होते. म्हणजे गणरायाच्या भक्तांकडूनच उत्सव झाल्यानंतर देवाकडे दुर्लक्ष होते, जे पर्यावरणीयदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्याही अयोग्यच होय. आपल्या शास्त्रातदेखील प्राणीमात्र, पर्यावरणावर प्रेमकरण्याचीच शिकवण दिलेली आहे. आपले कित्येक सण निसर्गाच्या विविध रूपांची पूजा करणारे आहेत. त्यामुळे केवळ गणेशोत्सवच नव्हे तर कोणताही उत्सव पर्यावरणाला हानी होणार नाही अशा पद्धतीने साजरा करण्याकडेच सर्वांनी लक्ष द्यायला हवे. दुसरीकडे गणपती विसर्जन मिरवणुकीत उधळल्या जाणार्याआ गुलालामुळेही अनेकांना त्रास होऊ शकतो. कारण हा गुलाल नैसर्गिक घटकांपासून बनविण्याऐवजी रासायनिक घटकांनी बनलेला असतो. या गुलालामुळे त्वचेवर पुरळ उठणे, खाज येणे, डोळे चुरचुरणे वगैरे त्रास होऊ शकतो. त्यामुळे रासायनिक घटकयुक्त गुलालाऐवजी नैसर्गिक रंगांची उधळण करत कोणालाही त्रास होणार नाही असा उत्सव साजरा करण्याची आवश्यकता आहे. उत्सवात होणारे ध्वनिप्रदूषण हादेखील दरवेळी चर्चिला जाणारा मुद्दा. पण केवळ गणेशोत्सव अथवा दूर्गापूजा यातील आवाजावर निर्बंध न लादता मशिदींमधून मोठ्या आवाजात वाजणारे भोंगेही बंद करण्याकडे शासनासह पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे; अन्यथा कायदा केवळ हिंदूंसाठीच आहे आणि इतरांसमोर तो हतबल होतो असा चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.
- महेश पुराणिक

No comments:

Post a Comment