आज काल फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाने समाजकार्याचा आव आणणाऱ्या तथाकथीत समतावादी प्रवृत्तीच्या मंडळींचा उपद्रव भलताच वाढला आहे. कोणतीही घटना असो कसलाही विचार न करता फुले शाहू आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि बहुजन समाजातील तरुणांची माथी भडकावयाची हा एक कलमी कार्यक्रम या मंडळींनी हाती घेतला आहे. या लोकांमुळे इतर समाजाला फुले, शाहू, आंबेडकरांचे नेमके म्हणणे काय होते हेच समाजात नाहीये. यांच्यामुळे फुल, शाहू, आंबेडकर केवळ विशिष्ट समाजापुरतेच मर्यादित करण्याचा डाव या समतावाद्यांनी आखला आहे आणि बहुजन समाजातील काही तरुण यांच्या नडला लागून मुख्य समाजापासून दूर जात आहे.
काय म्हणणे होते फुले, शाहू, आंबेडकरांचे.? केवळ समता...! हा एवढा एकच उद्देश त्यांच्या आयुष्यात होता. माझ्या धर्मातील, समाजातील बहुजन वर्गाला इतर उच्चवर्णीय लोकाप्रमाणेच सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा हेच फुले, शाहू, आंबेडकरांनी वेळोवेळी सांगितले आहे. याचसाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले आणि आपल्या समाजबांधवांसाठी कष्ट, त्रास, हाल-अपेष्टा सोसून न्याय मिळवून दिला. समता म्हणजे काय.? जसे इतर लोक जगतात त्याचप्रमाणे आम्हीही त्यांच्यासारखेच माणूस आहोत हे समजून आम्हालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे... आम्ही त्यांच्याहून कुणी वेगळे नाही आहोत, आम्हीही याच देशाचे नागरिक आहोत... आमचाही जगण्याचा सामान अधिकार आहे... याला समता म्हणतात...
परंतु आजकाल फुले, शाहू, आंबेडकरांच्या या हेतूला सुरुंग लावण्याचे भयानक कार्य काही समाजद्रोही मंडळींनी सुरु केले आहे. तर ही मंडळी काय करतात, तर आपल्या सभा, संमेलने, व्याख्याने, पुस्तके, मेळावे यातून केवळ द्वेष, विद्वेषाचे डोस बहुजन समाजाला देत असतात. इतर समाज कसा आमच्यापेक्षा वेगळा आहे किंवा आम्ही कसे त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत हे सांगण्याचा आटापिटा ही लोकं करत आहेत. म्हणजे ज्या फुले, शाहू, आंबेडकरांनी समतेचा उपदेश दिला तो नाकारून ही लोकं आता बहुजन समाजाला मुख्य प्रवाहापासून तोडण्याचे कार्य करत आहेत, आणि तेही फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेऊन.!
महात्मा फुले यांनी कधीही असे नाही म्हटले की, आम्ही या समाजापासून वेगळे आहोत तर त्यांनी नेहमी असे सांगितले की, माझा बहुजन, दलित समाज हा इतर जातीतील लोकांसारखाच आहे, त्याला वेगळे समजू नका. शाहू महाराजही समतेचेच पुरस्कर्ते होते. त्यांनीही कधी असे नाही म्हटले की, माझ्या बहुजन, दलित, अस्पृश्य समाजाला वेगळे समजू नका तर त्याला आपल्यातलाच माना. आंबेडकरांचेही तसेच. मग आजकाल जी मंडळी या महापुरुषांच्या समतेच्या तत्वालाच हरताळ फासत आहेत, त्यांचे नेमके उद्देश तरी काय आहेत हेही बहुजनांनी समजून घेतले पाहिजे. ही मंडळी आपल्या केवळ स्वार्थापायी बहुजन समाजाला भडकवत असून आपले दुष्ट हेतू साध्य करण्याचे प्रयत्न करत आहेत. एखादा प्रयोग फसला तर नवीन प्रयोग करून बहुजन समाजाला आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत.
बहुजन समाजाचे दुर्दैव असे की, एकही नेता अथवा संघटना या समाजद्रोही लोकांविरुद्ध बोलत नाही. यामुळे या तथाकथी समतावादी लोकांचे फावत आहे. तोंडाची वाफ दवडताना समतेच्या बाता मारायच्या मात्र काम करताना बहुजन समाजाला मुख्य प्रवाहापासून तोडण्याचे काम करायचे असे यांचे सुरु आहे. माथी भडकावण्यासाठी छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे, दादोजी कोंडदेव, पेशवाई असे भावनिक विषय घ्यायचे आणि काहीतरी खोटेनाटे सांगून चिथावणीखोर वक्तव्ये करायची की, आपला बहुजन तरुण लागलाच यांच्या नादाला. यातून बोलणार्याचा तत्कालीन राजकीय वा आर्थिक फायदा होतो. परंतु त्या तरुणांच्या हाती काय लागते. तर खोटेपणावर आधारलेलं तर्कट, जे कधीही सत्य नसतं तर या तथाकथित समतावाद्यांनी हवेत मारलेल्या गोळ्याच असतात.
आज बहुजन समाजात बेरोजगारी, खड्ड्यात जाणारी शेती, अल्प उत्पन्न असे गंभीर प्रश्न निर्माण झालेले असताना रोजगाराची, आधुनिक शेती तंत्रज्ञानाची, उत्पन्नाच्या नव्या नव्या मार्गांची गरज आहे. रोजगारक्षम प्रकल्प हाती घेण्याची आवश्यकता आहे, शेतीला पूरक व्यवसायांचे मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे, घटती पाणी पातळी कशी स्थिर ठेवता येईल, त्यात कशी वाढ करता येईल, प्रक्रिया उद्योग, छोटे उद्योग उभारून बहुजन समाजातील तरुणांना, तरुणींना, विवाहित स्त्रियांना कसे सक्षम करता येईल हे सांगण्याची आणि तसे करवून घेण्याची आवश्यकता आहे...न की बहुजन समाजाची माथी भडकावून त्यांना द्वेषाचे डोस पाजून इतर समाजापासून तोडण्याची गरज आहे.! परंतु ज्यांना या तापल्या तव्यावर आपली पोळी भाजून घ्यायची आहे ती लोकं समाजविघातक कृत्यच करण्यात आपला वेळ वाया घालवत आहेत आणि दुर्दैवाने बहुजन समाजातील काही तरुण यांच्या नादी लागत आहे.
केवळ ब्राह्मण समाज, संघ, भाजप, शिवसेना, हिंदू संघटना यांच्या विरुद्ध विषारी वक्तव्ये करायची आणि पुढची गम्मत पहायची असे या लोकांचे महत्कार्य सुरु आहे. बहुजन समाजाने यांच्या दावणीला न लागता आपल्या स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि समाज बांधवांच्या उत्कर्षाचा मार्ग चोखाळायला हवा, द्वेष विद्वेषाचा नाही. फुले, शाहू, आंबेडकरांनी समानतेचे तत्व सांगितले म्हणून ते महात्मा, राजर्षी, महामानव झाले. त्यांनी द्वेषाचे तत्वज्ञान नाही सांगितले, जे आजकाल तथाकथी समतावादी सांगत फिरत आहेत. यामुळे हे लोकं महात्मा नव्हे तर दुरात्मे होताहेत आणि त्यांच्यामुळे बहुजन तरुणही त्यांच्यासारखाच होत आहे. प्रेम, विश्वास, सहिष्णुता, सलोख्याने जग जिंकता येते आणि द्वेष, मत्सर, इर्षा याने इवलासा जीव सुद्धा कोणाला आपल्या अंकित करता येत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
संघ आंबेडकर जयंती साजरी करत नव्हता तर या मंडळींनी संघाला आंबेडकर विरोधी ठरवले, संघाने आंबेडकर जयंती साजरी केली तर त्याला संघाचा पब्लिसिटी स्टंट म्हणत ही मंडळी फिरत आहे. संघाने मातंग समाजातील व्यक्तींना पौरोहित्य प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली तर यांच्या पोटात गोळा उठला. कारण यांची दुकानदारीच केवळ विरोधासाठी विरोध आणि द्वेष यावर आधारित असल्याने या मंडळींना खरी समता नकोच आहे. त्याचमुळे या लोकांनी बहुजन तरुणाला द्वेषमुलक विचारसरणीचा गुलाम बनवण्याचा चंग बांधला आहे आणि काही तरुण याला बळी पडत आहेत.
यांचे हे द्वेषाचे काम हाणून पाडण्यासाठी यांच्याशी बहुजन समाजाने असहकार पुकारायला हवा. जी संघटना, पक्ष बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा आणि फुले, शाहू, आंबेडकरांनी सांगितलेल्या समतेच्या तत्वाचा पुरस्कार करेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज बहुजन समाजाने कार्य करण्याची आवश्यकता आहे. ब्रिगेड आणि तत्सम संघटना या केवळ द्वेषाची भावना समाजात वाढवत आहेत आणि हे समाजाच्या, देशाच्या ऐक्यासाठी हानिकारक आहे.
द ग्रेट फुले, शाहू, आंबेडकर हे समतेच्या तत्वामुळे महान झाले न की विषारी फुत्कारांमुळे. त्यामुळे बहुजन समाजाने द ग्रेट फुले, शाहू, आंबेडकर यांची समतेची तत्वे स्वीकारावी न की श्रीमंत पुरुषोत्तम कृत पुस्तकांतील, व्याख्यानांतील विषारी द्वेषाची तत्वे स्वीकारावी.

No comments:
Post a Comment