Saturday, 12 November 2016

फक्त बहिष्कार नव्हे - निर्मितीही हवी

दि. १० ऑक्टोबर २०१६ च्या दै. 'मुंबई तरुण भारत'मधील माझा वेध...!!!
***
फक्त बहिष्कार नव्हे

चिनी मालावर बहिष्कार टाका’, ’मी शपथ घेतो की आयुष्यात कधीही चिनी वस्तू वापरणार नाही.’ असे आवाहन, संदेश, शपथा सध्या देशभरात सार्वजनिकपणे आणि समाजमाध्यमातून जोरात पसरत आहेत.आपल्या भारतीयांचे एक बरे असते, पाकिस्तानला शिवराळ भाषेत झोडपले की आपल्याला जग जिंकल्याचा आनंद होतो! चिन्यांचा लाल्या-पाल्या-मिचमिच्या म्हणत उद्धार केला की आपल्याला मोठाच अभिमान वाटतो! हे व्हायला नको असे नव्हे, देशाच्या शत्रूंवर आणि शत्रूच्या मित्रांवर शाब्दिक वार, टीका तर व्हायलाच हवी, नव्हे वेळोवेळी झोडपायलाही हवे. पाकिस्तान आणि चीनसारख्या शत्रूविरुद्धचा रागही निरनिराळ्या प्रकारे व्यक्त व्हायलाच हवा. चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचा उपक्रमही देशावरील निष्ठा दर्शविणाराच! पण तरीही पुढे काय, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. त्या देशातील मालावर बहिष्कार घालणे हे पहिले पाऊल आहे. पण या सुरुवातीच्या पहिल्या पावलाने आपण जागतिक बाजारपेठेचे सीमोल्लंघन करणार की नाही? आज भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. संगणकाचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, रसायने, औषधे, फटाके, खेळणी, सजावटीचे साहित्य या वस्तूही चीन भारतात निर्यात करतो. अतिशय स्वस्त अशा या वस्तू सर्वसामान्यांना लगेच आकर्षितही करतात, पण यावर बहिष्कार हा एवढा एकच उपाय कसा असू शकेल?
चीनने कुख्यात मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात खोडा घातला किंवा ब्रह्मपुत्रेचे पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले की, आपला चीनविरोध उफाळून येतो. पुन्हा काही काळाने सर्व शांत झाले की, घ्या त्याच त्या चिनी वस्तू! पण आपण त्यापुढेही जाण्याचा विचार करायला हवा. अर्थात आपण भारतातही अशा वस्तू निर्मितीसाठी पुढाकार घ्यायला हवा. केवळ बहिष्काराने तात्कालिक समाधान मिळेल, पण राष्ट्राच्या उन्नतीसाठी चिनी मालाला मोठ्या प्रमाणात दीर्घकालीन उपायांनी पर्यायसुद्धा निर्माण व्हायला हवेत, जे विराट असा भारतीय समाजपुरुषच करू शकतो. सरकार तर आपल्या परीने ज्यातून नवउद्योजक घडतील अशा मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, मुद्रा बँक या विविध उद्योगहितैषी योजना राबवित आहेच. भारतीय अभियंत्यांनी, युवक-युवतींनी या योजनांच्या माध्यमातून चिनी मालापेक्षाही किफायतशीर आणि उत्तमवस्तू बनविल्या तरच चीनची मोठी असलेली रेषा आपोआप छोटी होईल आणि जागतिक बाजारपेठेतील खरेखुरे सोने भारतीयांना लुटता येईल.
***
निर्मितीही हवी

आपल्या देशाच्या बाजारपेठेत असे कोणतेही क्षेत्र नसेल ज्यात चिनी वस्तू उपलब्ध नसेल. अगदी जो आपला पारंपरिक सण आहे गणेशोत्सव, त्यातही चिनी बनावटीच्या गणेशमूर्ती विक्रीस असतात. दिवाळीतही लाखो आकाशकंदील आणि फटाके, लाईटच्या माळा चिनी बनावटीच्या असतात. आता आपल्याकडच्या सिग्नलवरदेखील चिनी वस्तू मिळतात म्हणजे चिनी माल उत्पादक कंपन्या, तेथील निर्मितीक्षेत्राने जवळपास सर्व प्रकारची बाजारपेठ काबीज केलेली आहे. यामागचे कारणही तेवढेच दमदार असल्याचे दिसते. चीनच्या गावागावात निर्मितीप्रकल्प उभारलेले आहेत, त्यांनी जो निर्मितीचा महाप्रचंड वेग, उत्पादन आणि मुख्य म्हणजे वितरणाची प्रणाली विकसित केली आहे, त्यालाही तोड नाही. मात्र भारतीयांची मानसिकता बर्याचदा सरकारने काहीतरी करावे अशीच असते. आपण स्वत: उठून अशा वस्तूंचे निर्मितीप्रकल्प कधी सुरू करणार आहोत? केवळ नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा नोकरी देणारे कधी होणार आहोत? जगातील जवळपास प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूत चिनी बनावटीचे सुटे भाग असतातच, याला त्यांच्याच भाषेत टक्कर देण्यासाठी येथील शहरांत, निमशहरी भागात या वस्तूंच्या निर्मितीचे केंद्र उभारणे हे येथील नागरिकांचेच कर्तव्य होय. केवळ चिनी मालाला शाब्दिक विरोध करण्यापेक्षा कृतिशील विरोध करण्याचा हाच एक मार्ग आहे. भारतात आणि महाराष्ट्रात अनेक महिला आणि काही अंशी पुरुष बचतगटही कार्यरत आहेत. यातील सदस्यांनी या दृष्टीनेही युद्धपातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. चिनी निर्मितीक्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे आज आणि उद्या बाजारात ज्या वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, त्याच्या निर्मितीचा निर्णय अतिशय वेगाने घेतला जातो आणि तो तेवढ्याच वेगाने पूर्णत्वासही नेला जातो. भारतात बर्याचदा वस्तूनिर्मिती कारागीर आपल्या अडचणींचे रडगाणेच गातात, मात्र त्या अडचणींवर मात करून आपले उत्पादन जगाच्या बाजारात गेले पाहिजे याचा विचार होताना दिसत नाही, जो होण्याची अतिशय आवश्यकता आहे. केवळ फेसबुक, व्हॉट्सऍप, हाईकसारख्या माध्यमातून मेसेजेस आणि पोस्टस फॉरवर्ड केल्या म्हणजे आपले कर्तव्य पार पडले, असे नाही. त्याच्या पुढची मोठी झेप घेण्यासाठीही पुरेशा ताकदीने आणि सातत्याने प्रयत्नरत राहणे आणि आपल्या देशावरील प्रेमापोटी जे आवश्यक आहे असे आर्थिक कर्तव्य पार पाडणेही अत्यावश्यक असते. कारण येणारा काळ हा पारंपरिक युद्धापेक्षा आर्थिक युद्धाचाच असणार आहे, ज्याला समर्थपणे, कृतिशीलतेने तोंड देणे हेच खरे राष्ट्रकर्तव्य होऊन जाते.

- महेश पुराणिक

No comments:

Post a Comment