Saturday, 12 November 2016

पैसा गरिबांनाच

दि. २४ ऑक्टोबर २०१६ च्या दै. मुंबई तरुण भारत मधील माझा वेध...!
***
पैसा गरिबांनाच

पंतप्रधान नैसर्गिक मदतनिधी कोषातील देणगीत दिवसेंदिवस वाढच होत असून मागील दोन वर्षांमध्ये सुमारे १ हजार ६१६ कोटी रुपये यात जमा झाले. ही रक्कमकॉंग्रेस सरकारच्या पाच वर्षांतील देणगीपेक्षाही जास्त असून सध्या या कोषाकडे २ हजार ६७५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी शिल्लक आहे.आपल्या देशात दानाचे महत्त्व पूर्वापार सांगितलेले असले तरी त्यातही दान ज्या कारणासाठी करण्यात येणार आहे, ते सत्पात्री, सत्कारणी लागावे हे अभिप्रेत असते.२०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी ज्यावेळी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्याचवेळी त्यांनी देशातील गरीब, असहाय्य, वंचित लोकांसाठी माझे सरकार कामकरेल, असे सांगितले. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदींनी ज्यांना गरज नाही त्यांना घरगुती गॅसचे अनुदान सोडण्याचे आवाहन करत गिव्ह ईट अप योजना आणली. पंतप्रधानांच्या या आवाहनाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत अनुदान सोडणार्यांची संख्या एक कोटींच्या पुढे गेली. आताही पंतप्रधान नैसर्गिक मदतनिधीत जो पैसा जमा होतोय, तो उच्चांकी पातळीवर आहे. या दोन्ही ठिकाणी पैसा सोडण्याची आणि देशातील गरिबांसाठी आपणही काहीतरी करायला हवे, अशी मानसिकता लोकांच्या मनात निर्माण करण्यात मोदींनी यश मिळवले. त्यामुळे लोकांची अशी मानसिकता कशामुळे तयार झाली, याचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. कारण आज समाजात बहुतेकदा इतरांचा पैसा कसा जास्तीत जास्त ओरबाडता येईल, असा विचार करणार्या मंडळींचेच प्रस्थ अधिक असलेले दिसते. मागील सरकारच्या काळात तर गरीबांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची स्पर्धाच लागली आहे की काय अशी परिस्थिति होती. रोज नवनवीन घोटाळे बाहेर येत होते, त्यामुळे त्या सरकारच्या काळात सामान्य जनतेलाही सरकारवर निदान आर्थिक बाबतीत तरी विश्वास ठेवावासा वाटत नसे. रोज नवनवीन घोटाळेच बाहेर येत असल्याने संपुआच्या पाच वर्षांच्या कालावधीत या मदत निधीत अतिशय कमी रक्कमजमा झाली. पण मोदींनी मात्र नागरिकांच्या मनात एक विश्वास निर्माण केला की, सरकारकडे जो पैसा येईल तो गरीबातील गरीब व्यक्तींच्या कल्याणासाठीच, सत्कारणासाठीच वापरला जाईल, त्यातील एका पैशाचाही भ्रष्टाचार होणार नाही आणि त्यामुळेच आज इतक्या मोठ्या प्रमाणात या कोषात मदतनिधी जमा झाला, हे उल्लेखनीयच!
***
संदेश टू सोल्जर

’सैन्य बोलत नाही तर पराक्रमगाजवते’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैन्याबद्दल सर्जिकल स्ट्राईकनंतर काढले. जे जवानांच्या पराक्रमामुळे यथार्थच ठरते. आताही आपले जवान काय करु शकतात याची प्रचिती नुकतीच आली. जगातील सर्वात कठीण समजल्या जाणार्याु कॅब्रियन गस्त सरावात भारतीय जवानांनी सर्वोत्तमकामगिरी केली व अव्वल क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले, हे खरे तर अभिनंदनीयच! सर्जिकल स्ट्राईक असो किंवा दहशतवाद्यांशी दोन हात करणे असो भारतीय सैन्याला त्यांची सर्वोच्च कामगिरी दाखवण्याची संधी दिली की, ते त्या संधीचे सोनेच करतात, हे या सरावातूनही दिसले. नुकतेच जम्मु सीमेवर भारतीय लष्कराने सात पाकिस्तानी जवान आणि एका दहशतवाद्याचा खात्मा केला. पाकिस्तानसारखी गिधाडाची पिलावळ शेजारी असल्यावर त्यांना त्यांच्याच भाषेत धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कर नेहमीच तत्पर असते हेही यातून सिद्ध झाले. परंतु, भारतीय लष्कराचे मनोबल खच्ची करण्याचे प्रयत्नही काही विघ्नसंतोषी लोक करत असतात, अशा लोकांना त्यांची जागा दाखवून देणेही गरजेचेच! पंतप्रधान मोदींनी भारतीय लष्कराची तुलना इस्त्रायली सैन्याशी केल्यानेही काही लोकांना पोटशुळ उठला, जे दुर्दैवीच म्हटले पाहिजे. अशा वेळी लष्कराचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांच्या मागे संपूर्ण देश असल्याचे त्यांना दाखवून देणे सर्वांचेच कर्तव्य ठरते. पुढच्या आठवड्यात दिवाळी सण साजरा केला जाईल, अशा मंगल प्रसंगी लाखो जवान सीमेवर असतील, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी केंद्र सरकार संदेश टू सोल्जर ही मोहिमराबवत आहे. याद्वारे देशातील नागरिक जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकतात. यामुळे संपूर्ण देशाला जवानांचे कुटुंब होऊन त्यांच्यासोबत असल्याचे दाखवून देण्याची संधी मिळाली आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जवानांना आपण दिवाळीच्या शुभेच्छा तर देऊच पण सर्जिकल स्ट्राईकचा पराक्रम, जागतिक सरावातील यश याच्याही शुभेच्छा देत प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या आणि देशाचे, नागरिकांचे रक्षण करणार्याे जवानांना शुभेच्छा देणे हे आपण आपले कर्तव्यच मानायला हवे आणि कोणत्याही कठीण प्रसंगी यशाची प्रार्थनाही करायला हवी.

- महेश पुराणिक
 —

No comments:

Post a Comment