दि. २१ नोव्हेंबरच्या दै. 'मुंबई तरुण भारत'मधील माझा वेध...!
***
“हिंदू हा शब्द उच्चारला तर आपल्यावर जातीयवादाचा शिक्का बसेल, अशी भीतीच
काहीजणांना वाटते. मात्र, आपल्या देशाला
हिंदुस्थान म्हणतात. हा हिंदुस्थान आहे आणि तो पाकिस्तान आहे,
हे लक्षात घ्यावे,’’ असे विधान व्यंकय्या नायडू
यांनी नुकतेच केले.
आपल्याकडे लहान मुलांना भीती दाखवण्यासाठी
एका अक्राळ-विक्राळ, भीतीदायक पण काल्पनिक
पात्राचे वर्णन केले जाते, यालाच बागुलबुवा म्हणतात. तर असाच हिंदू धर्म म्हणजे काहीतरी भयंकर प्रकार असल्याचा बागुलबुवा आपल्या
देशात हिंदू विरोध हा ज्यांचा आपद्धर्मच आहे अशा पुरोगामी, धर्मनिरपेक्ष,
बुद्धिवादी-बुद्धिजीवी, उदार,
म्हणवून घेणार्या बुद्धिभेद्यांनी केला.
यामुळेच नायडूंना असे विधान का करावे लागले किंवा एकूणच हिंदुत्व विचार
करणार्यांना का असे बदनामकेले जाते, याचा
विचार करता याला विरोधकांची हिटलर नीतिच कारणीभूत असल्याचे स्पष्ट होते.
एकदा हिटलरला विचारण्यात आले की, ’’ज्यू लोकांचा संपूर्ण खात्मा केला जावा असेच
तुझे मत आहे का?’’ त्यावर त्याने दिलेले उत्तर खरोखर डोळ्यात
अंजन घालणारेच आहे. तो म्हणाला, ’’नाही,
अजिबात नाही, ज्यू नावाचा कोणताही प्रकार अस्तित्त्वात
नसेल तर तो अस्तित्वात आहे असे दाखवावे लागेल. खरा ज्यू नसेल
तर काल्पनिक ज्यू तरी हवाच. चळवळ उभी करायची तर ज्याचा द्वेष
करावासा वाटेल, ज्याच्या नावाने द्वेषाची चिथावणी देता येईल,
असा कोणीतरी हाडामासाचा, खराखुरा शत्रू आवश्यक
असतो. असा शत्रू नसेल तर लोकांना चिथावता येत नाही. केवळ अमूर्त कल्पना पुढे करून ही गोष्ट साध्य होत नाही.’’ यातून हिटलरने हेच सांगितले की, चळवळ उभी करण्यासाठी
किंवा आपले राजकीय वा अन्य कोणतेही हितसंबंध जपण्यासाठी कोणीतरी आपला विरोधक असून त्याचे
जिवंत राहणे आपल्या विनाशाला कारणीभूत आहे, असा काल्पनिक शत्रू
उभा करावा लागतो आणि त्याच्या अनुषंगाने सामान्य जनतेला चिथवावे लागते, भ्रमित करावे लागते. तरच त्या चळवळीचे अस्तित्व टिकून
राहू शकते. याच हिटलरनीतिचा वापर आपल्याकडील ढोंगी पुरोगामी चळवळी
आणि त्यांच्या भणंग विचारांनी सदोदित केला. हिंदू नावाचा काल्पनिक
शत्रू निर्माण करून हिंदूंंना लक्ष्य केले. यातूनच देशात हिंदू
म्हणजे कोणीतरी भीतीदायक प्रकार असल्याचा प्रचार याच लोकांनी आपल्या ताब्यातील संस्था,
संघटना, शैक्षणिक आस्थापने, प्रकाशने यातून केला. या राष्ट्रातील नागरिकांची हिंदू
ही ओळख पुसण्याचे प्रयास करण्यात आले, कारण ही ओळख पुसली की,
या बुद्धीभेद्यांचे हित नक्कीच फावणार होते.
परंतु, भारतातच
नव्हे तर संपूर्ण जगात सहिष्णु आणि उदार असा धर्म, समाज म्हणजे
हिंदूच असल्याचे हिंदूंंच्या इतिहास आणि वर्तमानावरूनही होणारे आकलन या बुद्धिभेद्यांकडून
सोयीस्कररित्या विसरले, नाकारले जाते. मध्य-पूर्वेत, यूरोपात ख्रिश्चन आणि मुस्लिमांच्या क्रुसेडचा
रक्तलांछित आणि भारतातही मुस्लीमराज्यकर्त्यांच्या अत्याचाराने कळस गाठलेला इतिहास
ताजा असताना ही मंडळी बदनाममात्र हिंदूंनाच करतात. मेंदूला मुस्लीमप्रेमाचा
गंज चढलेल्या काही अभ्यासकांच्या मते तर अकबर, औरंगजेब,
टिपू सुलतान धर्मनिरपेक्ष आणि सहिष्णु असतात, पण
जे आपल्या राष्ट्र आणि धर्मासाठी प्रसंगी बलिदानही देतात त्या हिंदूंची किंमत शून्य
असते.
भारतातील अगदी स्वातंत्र्यानंतरचा एकूण काळ तपासला असता हिंदू समाज नेहमीच सहिष्णु
वर्तन करत आल्याचे दाखले प्रत्येकवेळी मिळतात. भले एखाद्याने आगळीक केली तरी ती सहन केली गेली.
मात्र तरीही हिंदूंनाच दूषणे देण्याचे महत्कार्य या बुद्धिभेद्यांनी
इमानेइतबारे केले आणि हिंदूंनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनाच जातीयवादी,
धर्मांध ठरवण्यापर्यंत मजल मारली. यातून हिंदूंनाच
खलनायक ठरवले गेले. या ठिकाणी हेही सांगणे आवश्यक आहे की,
हिंदू समाज सहिष्णु जरी असला तरी ते त्याचे दौर्बल्य नसून या राष्ट्रातील
प्रत्येक व्यक्ती या भारतमातेचीच मुले असून आपले बांधव आहे, असे
तो मानतो आणि तसेच वागतोही. पण तरीही नेहमीच हिंदूद्वेषाची पोटदुखी
असणार्यांनी हिंदूद्रोहाचेच फुत्कार सोडले. त्याचमुळे देशात हिंदुत्व विचार मांडला तर त्यावर जातीयवादाचा, भयंकरपणाचा शिक्का मारला गेला.
इतिहासातील उदाहरणे तसेच याचवर्षी कैराना येथे मुस्लिमांच्या अत्याचारांनी त्रस्त
झालेल्या हिंदूंनी घरदार सोडून स्थलांतर केल्याचे प्रकरण घडले, तरीही यात
हिंदूंच्याच माथी दोष देण्याचा प्रयत्न आणि मुस्लिमांच्या मनी निरागसता दाखवण्याचा
सोयीस्कर प्रकार बुद्धीभेद्यांकडून झाला. या सर्व घटना पाहता
हिंदूंनी संघटित होणे, हिंदुत्वाचा अभिमान वाटणे आवश्यक झाले
आहे. कारण जो स्वतःची ओळखच विसरतो तो सर्वस्व गमावतो.
याचसोबत भंपक पुरोगामी लोकांनी गेल्या काही
दिवसांतील घटना पाहता, पाकिस्तानप्रति जास्तच सहानुभूति दाखवल्याचे दिसले. आपण ज्या
देशात राहतो त्याच्यावरच प्रश्नचिन्हही लावले गेले, त्याला विचारस्वातंत्र्य, प्रश्न
विचारण्याचा अधिकार वगैरे लेबलेही लावली गेली, त्याचमुळे नायडुंनी केलेले, हा हिंदुस्तान
आहे, पाकिस्तान
नाही हे विधान महत्त्वाचे ठरते.
- महेश पुराणिक

अप्रतिम वास्तवावर आधारीत माहितीपूर्ण लेख!
ReplyDelete